Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराजांवर ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची असीम कृपा होती. स्वामींचे गजानन महाराजांना दैवी मार्गदर्शन लाभले होते. स्वामी समर्थांच्या आदेशानुसारच गजानन महाराजांनी अलौकिक कार्य करत भक्तांचे कल्याण केले, असे सांगितले जाते.
अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्णवतार मानले जाते. स्वामींचे कोट्यवधी भक्तगण आहेत. स्वामींची शिष्यपरंपराही मोठी थोर आहे. याच शिष्यपरंपरेतील एक दैवी शिष्य असे सहज म्हणता येतील, असे शेगावीचे गजानन महाराज आहेत. स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्या चरित्रात अनेक साम्ये आढळतात, असे सांगितले जाते. गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन आल्यामुळे स्वामी महाराज आणि गजानन महाराज या दोघांचे केलेले पूजन, नामस्मरण, आराधना, जप-मंत्र पठण अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानले जाते, असे म्हणतात. बीडकर महाराज, शंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), नृसिंह सरस्वती (आळंदी), सीताराम महाराज (मंगळवेढे), साईबाबा (शिर्डी), देवमामलेदार (नाशिक), रांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), स्वामीसुत (मुंबई), बाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि गजानन महाराज (शेगांव) आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येतील. या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात, असे सांगितले जाते.
स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य
अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते, असे सांगितले जाते. दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत. गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली, असे अनेकांचे मत आहे. स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते, असे अनेकजण म्हणतात.
स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांची भेट
गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी कुठे होते? ते कुठून आणि कसे आले? या संबंधीचे वर्णन दासगणू महाराजांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथात नाही. परंतु, तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी याबाबत काही माहिती लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. श्री गजानन महाराज शेगावला येण्याआधी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते. तिथे त्यांनी आपले बालपण घालविले. अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली. सिद्धपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशा प्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले व आपल्या समाधीची त्यांना जाणीव करून दिली, असे सांगितले जाते.
स्वामींनी आदेश दिला की, विदर्भात जा, शेगाव येथे प्रकट हो
अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की, तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे, असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. महाराज त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवून म्हणाले की, अरे तुझे जीवन पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले आहे. तुझ्या अंतरी अजूनही षडरिपु पशु बनून राहिलेले आहेत त्यांना दूर कर. अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा. पुजारी गहिवरला आणि त्याने वरती पहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्याने इकडे तिकडे बरेच शोधाशोध केली पण ती दिव्य विभूती त्याला काही भेटली नाही. पण आता तो अंतर्बाह्य शुद्ध झाला होता.
गजानन महाराजांचे भक्तांना कालातीत आश्वासन
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नही जिंदा है, असे स्वामी समर्थ महाराजांनी भाविकांना आश्वस्त केले होते. अगदी त्याचप्रमाणे अवतार सांगता करताना गजानन महाराज म्हणाले की, मी गेलो ऐसे मानू नका । भक्तित अंतर करू नका । कदा मजलागी विसरु नका । मी आहे येथेच ॥ दु:ख न करावे यत्किंचित । आम्ही आहोत येथेच । तुम्हा सांभाळण्यापरी सत्य । तुमचा विसर पडणे नसे ॥ यावरून स्वामी समर्थ महाराजांनी तसेच गजानन महाराजांनी आपल्या भाविकांना आपण कायम तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिल्याचे दिसून येते, असे म्हटले जाते. आजही लाखो भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन होतात. नतमस्तक होतात. ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथांचे नित्यनेमाने पारायण केले जाते. प्रकटदिनानिमित्ताने महाराजांचे मनोभावे स्मरण करूया आणि म्हणूया...
।। श्री गजानन जय गजानन।।
।। गण गण गणात बोते ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।