Shravan Varad Laxmi Vrat 2025: श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील प्रत्येक दिवशी आचरली जाणारी व्रते अनन्य साधारण आहेत. प्रत्येक व्रताचे वैशिष्ट्य वेगळे आहे. विविध अर्थाने ही व्रते महत्त्वाची मानली गेली आहे. श्रावण महिन्यातील असेच एक शुभ पुण्य फलदायी व्रत म्हणजे वरदलक्ष्मी व्रत. यंदा २०२५ मध्ये हे व्रत शुक्रवारी आले आहे. शुक्रवार हा लक्ष्मी पूजनासाठी विशेष आणि सर्वोत्तम मानला जातो. श्रावण शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत आल्याने याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे, असे म्हटले जाते. श्रावण वरदलक्ष्मी व्रत नेमके करावे? सोपी पद्धत, महत्त्व, महात्म्य आणि मान्यता जाणून घेऊया...
शुक्रवार, ०८ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण वरदलक्ष्मी व्रत आहे. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा किंवा जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जिवतीच्या पूजनासह श्रावणातील या तिसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केल्याने शुभ लाभ होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल, अशा व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे, असा सल्ला दिला जातो.
वरदलक्ष्मी व्रत महत्त्व अन् मान्यता
वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते. मात्र, सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच, असे नाही. मात्र, तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये, यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात. या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते.
‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत पूजन
सुरुवातीला घराची साफसफाई करावी. शुचिर्भूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरदलक्ष्मीची कहाणीचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपास करावा, असे सांगितले जाते. सुवासिनीची खणा-नारळाने ओटी भरावी. देवादिकांनी आणि ऋषिमुनिंनी 'श्री वरदलक्ष्मी' म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरदलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणार्यांच्या घरामध्ये धन-धान्य यांची समृद्धी होऊन संतती भाग्यशाली बनेल, असे श्री वरदलक्ष्मी देवीचे वचन आहे.
वरदलक्ष्मी व्रतकथा
एकदा कैलासावर शिव-पार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेल्या पार्वतीमातेने त्या गणाला, तू कुष्ठरोगी होशील, असा शाप दिला. परंतु, शिवाने त्याचा निर्णय योग्य होता, हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उ:शाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वती देवीने, एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील. त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला, अशी वरदलक्ष्मी व्रत कथा पुराणात आढळून येते.
वरदलक्ष्मी व्रत पूजनानंतर लक्ष्मी देवीची आरती अवश्य म्हणा
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते । प्रसन्न होऊनि आतां वर दे आम्हांते।। धृ. ।।
श्रीविष्णुकांते तव विश्वावरि सत्ता । स्थिरचर दौलत देसी लक्ष्मीव्रत करितां ।। १ ।।
जननी तुजऐसी या नाही त्रिभुवनीं । सुरवर वंदिती मस्तक ठेवुनि तव चरणी ।। २ ।।
कृपाप्रसादें तुझिया लाभे सुखशांति । चिंताक्लेशहि जाती नुरते आपत्ती ।। ३ ।।
वैभव ऐश्वर्याचें आणि अपार द्रव्याचें । देसी दान दयाळे सदैव सौख्याचे ।। ४ ।।
यास्तव मिलिंदमाधव आरती ओवाळी । प्रेमें भक्तिभावें लोटांगण घाली ।। ५ ।।
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते ।।