शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

तुकाराम बीज: आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा; देहूतील नांदुरकी वृक्ष आजही सळसळतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:13 IST

Sant Tukaram Beej 2025: यंदा १६ मार्च रोजी तुकाराम बीज आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमानाच्या दिवशी आजही मध्यान्ही देहूतील नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष सळसळतो, असे म्हटले जाते.

Sant Tukaram Beej 2025: आम्ही जातो आपुल्या गावा । आमचा राम राम घ्यावा ।। तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी ।। आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ।। येतां निजधामीं कोणी । विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ।। रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ।।, १६ मार्च रोजी श्रीतुकाराम बीज. जगद्गुरु श्रीसंत तुकोबारायांचा वैकुंठगमन दिवस होय. इ.स. १६०९ मध्ये माघ शुद्ध पंचमी, वसंतपंचमीला त्यांचा जन्म झाला व इ.स. १६५० साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला, वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी ते भगवान पंढरीरायांच्या साक्षीने सदेह वैकुंठाला गेले, असे म्हटले जाते. 

महापुरुष, संत, कवी हे जन्मावे लागतात, ते घडविता येत नाहीत असे आपण समजतो. हा समज खोटा ठरविणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज.  भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले. तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपाटला जातो. तुकोबा वामनाप्रमाणे सारी भूमी पादाक्रांत करतात आणि आकाशालाही गवसणी घालतात. सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे. चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला. व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे सहस्यही उलगडून दाखविले.

जगरहाटीचे दर्शन आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले

तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाई हीदेखील गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. या अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले. संसारात वावरत असताना येणाऱ्या सुख-दुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही. स्वतः कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करुन देणारे तुकोबा महान संत आहेत.

अद्भुत कार्याने अवघ्या महाराष्ट्रालाच नाही, तर संपूर्ण विश्वाला लावले वेड

'मराठी म्हणजे माउली-तुकोबांची भाषा', असे समीकरणच आता रूढ झालेले आहे. त्यांची अजरामर अभंगवाणी ही त्यांच्याचसारखी अद्भुत गुणवैशिष्ट्ये असणारी, त्यांची साक्षात् वाङ्मयी श्रीमूर्तीच आहे. तिच्या रूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजच सदैव आपल्याला आशीर्वाद देत आहेत. "धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ।" अशी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून प्रत्यक्ष देहाने वैकुंठगमन करणारे, आपल्या विलक्षण अभंगवाणीच्या माध्यमातून जनमानसाला विठ्ठलभक्ती, सदाचरण, परोपकार इत्यादी सद्गुण-मूल्यांचे सुयोग्य मार्गदर्शन करणारे, "भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।" असा दुर्दम्य आत्मविश्वास असणारे, अत्यंत सडेतोड, परखड; पण त्याचवेळी मनाने अत्यंत सरळ, साधे, प्रेमळ असे श्री तुकोबाराय हे फार विलक्षण अवतारी सत्पुरुष होते. 

देहूतील नांदुरकी वृक्ष आजही हलतो

आजही या द्वितीयेच्या मध्यान्ही देहूच्या इंद्रायणीगंगेच्या काठावरचा नांदुर्कीचा पुरातन पावन वृक्ष श्रीभगवंतांच्या आगमनाची शकुनलक्षणे जाणून सळसळतो, पक्षिराज गरुडाच्या विशाल पंखांच्या फडात्काराने वाहणा-या वा-याच्या तीव्र वेगाने आसमंत सुगंधित होतो, इंद्रायणीचा पुनीत काठही श्रीभगवंतांच्या दिव्य पदस्पर्शाने शहारतो, देवांना साक्षात् समोर पाहून, विश्व व्यापून उरलेल्या श्री तुकोबारायांचा कंठ आजही तितकाच दाटतो, त्यांचे थरथरणारे हात तेवढ्याच प्रेमावेगाने श्रीभगवंतांच्या चरणांना मिठी मारतात, नेत्रांतून अविरत वाहणारे आनंदबिंदू लक्ष्मीमातेने सेवन केलेले तेच पुण्यपावन श्रीचरण पुन्हा एकदा धुवून काढतात, श्रीभगवंतही आपल्या या लाडक्या सख्याला अत्यंत आनंदाने, अभिमानाने उराशी कवटाळतात; आणि तोच अलौकिक, अपूर्व-मनोहर, अद्वितीय वैकुंठगमन सोहळा पुन्हा एकदा नव्याने साकारतो.

काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने तुकोबा स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक

खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत.

संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता 

संत तुकाराम गाथा म्हणजे बहुजनांची गीता आहे. ज्ञानोबा आणि तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संघर्षमय जीवन जगूनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणाऱ्या तुकारामांनी फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठगमन केले.

 

टॅग्स :sant tukaramसंत तुकारामdehuदेहूdehuदेहूspiritualअध्यात्मिक