२७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव(Ganesh Chaturthi 2025) सुरू झाला आणि पाठोपाठ २८ ऑगस्ट रोजी ऋषिपंचमी(Rishi Panchami 2025) साजरी केली जाते. ऋषींचे आपल्या आयुष्यात किती योगदान आहे हे सांगण्यासाठी हा एक श्लोक अर्थासकट समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. तो म्हणजे मंत्रपुष्पांजली! गणेशोत्सवात दहा दिवस आरती झाल्यावर आपण आरतीचा समारोप मंत्रपुष्पांजलीने करतो. पण तिचे स्पष्ट उच्चार आणि अर्थ जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते...
काही जण विचारतात, जशी ख्रिस्त बांधव, जैन बांधव, मुस्लिम बांधव, शीख बांधव इ. धर्मियांची आपापल्या धर्मात एक प्रार्थना असते, जी त्यांच्या जगभरातील बांधवांना पाठ असते, तशी हिंदू धर्मात एखादी प्रार्थना नाही का? तर त्याचे उत्तर - अशी समस्त हिंदूंसाठीदेखील एक प्रार्थना आहे. ती प्रार्थना वैदिक काळापासून म्हटली जात आहे आणि ती सर्वांना पाठ देखील आहे. फक्त तिचे उच्चारण नीट व्हावे अशी अपेक्षा असते, ते होत नाही आणि त्याचा अर्थ समजून घेतला जात नाही. चला, जाणून घेऊ ती प्रार्थना व तिचा अर्थ...
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥
अर्थ : फार पूर्वीच्या काळात मूर्ती पूजा नाही तर यज्ञ कर्म हे उपासनेचे प्रकार होते. स्वर्गस्थित परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी यज्ञ हा एकमेव मार्ग समजला जात असे आणि तोच धार्मिक विधींचाही एक भाग होता.
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।स मस कामान् काम कामाय मह्यं।कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय।महाराजाय नम: ।
अर्थ : चरितार्थासाठी अर्थार्जन महत्त्वाचे. त्यासाठी भगवान कुबेर यांची प्रार्थना करत आहोत. त्यांनी सर्वांची इच्छा पूर्ण करून सर्वांना समाधानी ठेवावे.
ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यंवैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति ॥
अर्थ : आपले राज्य सर्वांसाठी कल्याणकारी राज्य होवो. आमचे राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण होवो. इथे लोकशाही राज्य असू दे. आमचे राज्य आसक्तीमुक्त, लोभमुक्त होवो. खुद्द परमेश्वराने या विश्वाची सूत्रे सांभाळून सर्वत्र सुव्यवस्था संस्थापित करावीत. क्षितिजापल्याड या राज्याच्या सीमांचा विस्तार होवो. सर्वांना दीर्घायुष्य लाभो आणि सुखी, समाधानी जीवन जगण्याचा अधिकार मिळ.
ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥
अर्थ : हा श्लोक राज्याच्या हितासाठी आणि राज्याचा गौरव गाण्यासाठी गायला गेला आहे. अशा सुंदर सृष्टीचा, राष्ट्राचा सभासद होण्याचे भाग्य मला मिळो.
किती सुंदर प्रार्थना आहे ही. कोणा एकासाठी नाही, तर समष्टीसाठी! आरती झाल्यावर आपण सगळेच ही मंत्रपुष्पांजली म्हणतो, परंतु योग्य ठिकाणी करायचा न्यास, त्याचे उच्चार आणि त्याचा अर्थ समजून घेत नाही. तो आपण नीट शिकून घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीलाही शिकवला पाहिजे. जेणेकरून जगाच्या कानाकोपऱ्यातील समस्त हिंदू बांधव ही राष्ट्रीय प्रार्थना शिकून, समजून घेऊन म्हणू शकतील.