Rishi Panchami 2021 : आपण ज्या ऋषींच्या गोत्रात जन्माला आलो त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ऋषिपंचमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 07:30 AM2021-09-11T07:30:00+5:302021-09-11T07:30:02+5:30

Rishi Panchami 2021 : ऋषींनी लिहीलेल्या व आचरणात आणलेल्या सर्व विद्या, कला त्यांचे वंशज व वारस म्हणून आजही आपल्याला शिरोधार्थ आहेत. म्हणून त्यांचे विस्मरण न होऊ देण्यासाठी त्यांचे स्मरण.

Rishi Panchami 2021: Rishi Panchami is the day to remember the tribe of sages in which we were born! | Rishi Panchami 2021 : आपण ज्या ऋषींच्या गोत्रात जन्माला आलो त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ऋषिपंचमी!

Rishi Panchami 2021 : आपण ज्या ऋषींच्या गोत्रात जन्माला आलो त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ऋषिपंचमी!

googlenewsNext

रवींद्र वासुदेव गाडगीळ

आज ऋषिपंचमी. आपल्या वेदकालीन पूर्वजांचे स्मरण करण्याचा दिवस. दरवर्षी गणपतींनंतर पुढील राखीव पंधरा दिवस आपल्या गत कौटुंबिक पितरांचे, नातेवाईकांचे स्मरण करून त्यांना भोजन वाढून तृप्त करुन आशीर्वाद घेण्याचे  दिवस. पण आज मात्र वानप्रस्थात कायम राहून जप,तप,ध्यान, ध्यारणा, संशोधन,चर्चा, वादसंवाद करून मानवाच्या, समाजाच्या उत्क्रांतीसाठी, विकासासाठी नवनवीन शोध लावून नित्यनव्याची भर घालणार्‍या ऋषीमुनींचे कृतज्ञतेने स्मरण. 

आज भाद्रपद शुद्ध पंचमी. ज्यांनी वेदांचे प्रकटीकरण केले. त्यांचा मुलार्थ सर्वसामान्यांना समजेल, असा सुलभ करून पोहोचवला. वेळोवेळी मार्गदर्शन केले. शास्त्रार्थ सांगितला. अलौकिक धर्मंग्रंथ व ज्ञानाचे भांडार उघडून दिले. संस्कार, संस्कृती,आचारविचार,रूढी, चालीरीती यांचे संगोपन,संवर्धन करून सुविचार व महान सांस्कृतिक वारसा दिला. त्या ऋषीमुनींबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शब्द द्यायचा की “आम्ही चालवू हा पुढे वारसा.” त्या असंख्य ऋषींचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे सप्तर्षि. आकाशगंगेत दिसणारे. आणि आपल्या जनमनात कायम वावरणारे.

काश्यप ऋषी: 

कश्यप: सर्वलोकेषू: सर्वदेवेषू: संस्थित:
नराणाम पापनाशाय ऋषिरूपेण तिष्ठति”        

आठवते का काही? पूजेला बसल्यावर गुरुजी हमखास प्रश्न विचारतात “आपले गोत्र?” संकल्प सोडतांना ते लागते. माहिती पाहिजे. “अमुक गोत्रोत्पंनोहम” पण, माहिती नसते. कारण जिज्ञासाच नाही. मग इकडे तिकडे बघत फजिती नको म्हणून ठोकून देतात. “काश्यप!” कश्यपचा अपभ्रंश. पूर्वी दाते पंचांगात सर्व वर्णांची आवश्यक गोत्रे येत असत. सृष्टीचे पालन करतो तो पती. पती म्हणजे नवरा नव्हे तर पालनकर्ता. सभापती राष्ट्रपति, गणपति, लखपती, लक्ष्मीपती, करोडोपती, विद्यावाचस्पती तसे हे कश्यप महामुनीसुद्धा मोठे पालनकर्ते! ह्यांनी अनाथ अशा प्रजेचे आपल्या मुलांप्रमाणे पालन केले.

अत्री ऋषी: 

“अत्रेयच नमस्तूभ्यम सर्वभुतहितैषीणे, तपोरूपाय सत्याय ब्रह्मणेमित तेजसे” ||   
दत्ताचा अवतार पुत्र जया साजे, अत्रीऋषिना त्रिवार वंदन भक्तांचे ||                            

इतके सुंदर कौटुंबिक सख्ख्यतेचे उदाहरण आजपर्यंत झाले नाही. किती सामंजस्य तन –मन-धनाने एकमेकांमध्ये. परस्परांमधील विश्वास, प्रेम, निष्ठा, आदर, सहकार्य होते. का नाही संसार सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा होणार? म्हणून देवालाही  तेथे अवतार घ्यायचा मोह आवरता आला नाही.
“त्रिगुणात्मक त्र्यैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्र्यैलोक्य राणा”|| 
इतके उग्रतप या मुनींचे व सती अनुसुयेचे. आलेला अतिथि रिक्तहस्ते विन्मुख जाणारच नाही हा शिरस्ता. एक दोन मूठ धान्य,शिधा,दक्षिणा काही तरी झोळीत देणारच. शिवाय अतिथीचे सहर्ष स्वागत, आदराने पाद्यपूजन व मीतूपणाची बोळवण करून पोटभर जेवण वाढणे वेगळे. सोपं नाही ते,एका स्त्री मनाला.

भारद्वाज ऋषी:

भारद्वाज नमस्तूभ्यम सदाध्यानपरायण महाजटिल धर्मात्मा पापं हरतू मे सदा:” |

भारद्वाज मुंनींनी उग्र तप करून अष्टमहासिद्धी प्राप्त करून घेतली होती. तरी ते अत्यंत निस्पृह व निगर्वी असे व्यक्तिमत्व होते. म्हणून प्रात:स्मरणीय.

विश्वामित्र ऋषी:

विश्वामित्र नमस्तूभ्यम बली मख महाव्रतम,अध्यक्षीकृत गायत्री तपोरूपेण संस्थितम” ||          
विश्वामित्रा झाली प्रसन्न गायत्री, राम लक्ष्मणा विद्या प्रेमे शिकविती| 
ब्रह्मयापेक्षा सृष्टी आगळीच निर्मिती||         

ह्यांच्याबद्दल काय आणि किती सांगावे? कर्माने क्षत्रीय असूनही "ब्रह्मर्षि" होण्यासाठी किती कठोर तप करावे? इतके की सूर्य व गायत्री प्रसन्न व्हावी. स्वतःच्या मस्तकावर सौर ऊर्जा प्रस्थापित करून त्यावर अन्नपूर्णा बोलावून वशिष्ठांना जेवू घातले. आणि वसिष्ठांच्याच शतपुत्रांना मारून प्रायश्चित्त घेऊन पश्चातापदग्ध होऊन पावन झाल्यावर त्याच वसिष्ठांनी त्यांना “ब्रम्हर्षी” म्हणून सन्मान द्यावा. प्रत्यक्ष भगवंत अवताराला म्हणजे राम लक्ष्मणांना त्यांनी "युद्ध प्रशिक्षण" दिले. अहो भाग्यम.         

गौतमऋषी:

“गौतम: सर्वभूतांनाम मृषीणाम च महाप्रिया: श्रौतानाम कर्मणा चैव संप्रदाय प्रवर्तक:” ||   
गौतम ऋषि ते गंगा दक्षिणप्रांती, गोदावरी रुपे आवाहन करीती| 
कृषिकार्याची दीक्षा लोकांना देती,न्यायाची दर्शनसूत्रे रचिताती||         

कोणतेही संकट येवो, अर्ध्या रात्री कोणीही त्यांचेकडे जावो. दानव, मानव,देव यापैकी कोणालाही तत्काल उकल मिळणारच. इतके विद्वान. नुसते सांगायचे नाहीत, तर त्यात सहभागी होऊन सहकार्य करायचे व त्यांचे नेतृत्वही करायचे.  तत्कालीन जलसंधारण योजनेचे अध्वर्यू. पाणी अडवा,पाणी जिरवा. त्यांनीच तर गंगा पृथ्वीवर आणली ना. राजा भगीरथाच्या मदतीने उग्र तप (प्रयत्न व अफाट कष्ट) केले म्हणून भागीरथी. गौतमांनी आणली म्हणून गौतमी. (मोडक सागर कसा मोडक इंजीनीअरांनी जीव ओतून बांधला तसा), सुवर्ण चतुष्कोण नदी जुळवणी प्रयोग त्यांचाच. प्रजा समृद्ध व्हावी. पृथ्वी सुजलाम सुफलाम व्हावी हे स्वप्न त्यांनी साकार केले. आजच्या कृषिक्षेत्राचा भरभक्कम पाया त्यांनी त्या काळात रचला व कंदमुळे खाणारा मानव तेंव्हापासून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंभू व शुद्ध शाकाहारी झाला.

जमदग्नि ऋषी:

“जमदग्निर्महातेजा स्तपसा ज्वलितप्रभा: 
लोकेषू सर्वसिद्ध्यर्थम सर्वपाप निरर्थक:”||       
जमदग्नीचे दुर्धर तप ते जगतात,
परशुराम अवतार त्यांचा हो पुत्र| 
रेणुकामाता शक्तीचा स्त्रोत,अघटित लीला करिते जगती प्रगट ||      

अत्यंत उग्र तप करणारे ऋषि, परंतु अत्यंत तापट,रागीट, क्रोधी पण त्यांचे कार्य मात्र महान. दुष्कृत्य हातून कळत-नकळत घडत असते, त्याचे समर्थन न करता (एस्क्युझ न मागता) प्रायश्चित्त घेऊन पश्चात्ताप होऊन लोकांतात जाहीर करावा, आपल्या कृतीतून तो दाखवावा. गुन्हेगारी, अराजकता समूळ नष्ट होईल. हे त्यांनी न्यायिक विचार वेळोवेळी मांडले.

राजे हे जनसंपत्तीचे केवळविश्वस्त असतात मालक कींवा उपभोक्ता नसतात ज्यामुळे प्रजा,जनता आश्वस्त असते. प्रजेचे पालन हेच त्यांचे प्रमुख कर्तव्य. म्हणूनच त्यांना प्रजापालक भगवान विष्णुंप्रमाणे देवाचा अवतार मानतात. पण जेंव्हा ते आपले कर्तव्य विसरून उन्मत्तपणे सिंहासने राबवू लागले, प्रजा त्रस्त झाली तेंव्हा त्यांचा संहार करावा लागला. इतके की भगवान परशुरामांनी एकवीसवेळा त्यांना निष्क्रिय केले. तरी उरले. उन्मत्त वागू लागले. तेच ह्या राक्षसी व्रुत्तीला आवर घालण्याचे महत्कार्य पुन्हा श्रीरामाने, श्रीकृष्णाने केले. आणि आजही ते काही राक्षस  प्रजेच्या जिवावर निवडून येऊन हुकुमशाही,जुलूमजबरदस्ती करत उन्मत्तपणे वावरत आहेत आणि प्रजा हतबल होऊन आणखी एका नव्या अवताराची वाट बघत आहे.

वसिष्ठऋषी: 

“नमस्तूभ्यम वसिष्ठम लोकांनाम वरदाय च,
सर्वपापम प्रणाशाय सूर्‍यांपाय हितैषिणे” ||
वसिष्ठ ते उपदेश रामासी करीती, 
ब्रह्मर्षि म्हणुनिया विख्यात जगती| 
सर्वज्ञ, तत्वज्ञ, सत्वशील वृत्ती, 
विश्वामित्रावरती कृपाही करिताती| 
सूर्यापेक्षा त्यांची तेजस्वी छाटी, 
ज्ञाने प्रेमे कवणा देती, नवनवी स्फूर्ति||       

विश्वामित्रांनी क्रोधात येऊन वसीष्ठांचे शतपुत्र मारले, तरीदेखील त्या शांतिमूर्तीने विश्वामित्रांनाच 'ब्रह्मर्षि' म्हणून कृतकृत्य केले. संपूर्ण रामायणात ही अशी एकच व्यक्ति आहे, जी भावनांच्या लाटेवर कधी स्वार झालेली नाही. संयमाचा परिपाठच घालून दिला आहे. “योगवसिष्ठ” हा ग्रंथ आजही प्रसिद्ध आहे.

अरुंधति तपस्विनी:

“अरुंधति नमस्तूभ्यम महापाप प्रणाशिनी, पतिव्रतानाम सर्वांसा धर्मशील प्रवर्तते” ||    

सद्यस्थितीत विज्ञानयुगात 'पतिव्रता' हा शब्द कालबाह्य व हास्यास्पद ठरलेला असला, तरी त्या शब्दाचा अर्थ, हेतु, गाभा शांत, सुखी आनंदी समाधानी, परस्पर विश्वासाच्या संसाराचा आत्माच आहे. हे नाकारून चालणार नाही. म्हणूनच सारे विश्व आपल्या भारताकडे सुंदर कौटुंबिक अनुकरणीय एकमेव व्यवस्था म्हणून आश्चर्यचकीत होऊन पहाते. सप्तर्षिंबरोबर ह्या प्रातःस्मरणीय तपस्विनीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. केवढा मोठा हा बहुमान.

हे सप्तर्षि व वाल्मिकी, चरक, च्यवन, मार्कंडेय, कौशिक, पूलस्त्य, आंगिरस, भृगु, मनू, गर्ग, सांदीपनि, ऋषशृंग, दुर्वास, विभांडक, कर्दम, व्यास, कणव, कणाद, अगस्ति ह्यांनी संहिता, ब्राह्मण, आरण्यक, पद, क्रम, शिक्षा, व्याकरण, ज्योतिष, कल्प, छंद, निघंटु, निरुक्त, उपनिषदे, पुराणे, स्तोत्र, कथा, रामायण, महाभारत, भागवत, १४ विद्या ६४ कला, चार वर्णाश्रम, षोडशोपचार पुजा, सोळा संस्कार, यज्ञयाग, कथा, व्रत वैकल्प, कहाण्या, योगविद्या, धनुर्विद्या, रणविद्या, युद्धकला, अणू रेणु शस्त्र, शास्त्र,विमाने, ह्यांचे हे शोध व बोध,केलेले विविधांगी योगदान विसरून कसे चालेल?( कोण म्हणतो, ह्यांनी हे पोट भरण्यासाठी लिहिले? कलेवर होऊन जगण्यापेक्षा कलेवर जगणे काय वाईट?) यावर पुन्हा कधीतरी लिहिन. परंतु, यांनी लिहीलेल्या व आचरणात आणलेल्या सर्व विद्या, कला त्यांचे वंशज व वारस म्हणून आजही आपल्याला शिरोधार्थ आहेत. म्हणून त्यांचे विस्मरण न होऊ देण्यासाठी त्यांचे स्मरण. जयोस्तुते!

Web Title: Rishi Panchami 2021: Rishi Panchami is the day to remember the tribe of sages in which we were born!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.