शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Sant Gadge Baba Maharaj: सेवा परमो धर्म:... समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे थोर सुधारक संत गाडगे महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 10:14 IST

Sant Gadge Baba Maharaj: विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून गाडगेबाबांनी लोकांची मने स्वच्छ केली. पुण्यतिथीनिमित्ताने जीवनकार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

Sant Gadge Baba Maharaj: महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला संतांची थोर परंपरा लाभली आहे. प्रत्येक संताचे कार्य वेगळे, अफाट आणि महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने या संतांच्या जीवनकार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. गाडगे महाराज यांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. गाडगेबाबा यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या समाजापुढे श्रमांचा आदर्श ठेवला.

गाडगे महाराजांची बारा वर्षे अज्ञातवासात 

गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले.

‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’चा गजर

गाडगेबाबा चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून गाडगेबाबांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार, प्रसार केला. गाडगे महाराजांना संतांचे अभंग तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत.

संत व सुधारक गाडगेबाबा

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. त्यांचे उपदेशही साधे व सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते नेहमी सांगत असत. देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग करत असत. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेबाबा यांच्यात होत्या.

गाडगेबाबांनी केली जनकल्याणाची अनेक कामे

गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे केली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. गाडगे महाराज समतेचे पुरस्कर्ते होते. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप अपार कार्य आणि कष्ट केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :spiritualअध्यात्मिक