Ratha Saptami 2025 Date Time And Vrat In Marathi: मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव येतात. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा आहे. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्चालक असून, तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे, असा संदर्भ रथसप्तमीला आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहांचा राजा असून, त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे.
मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी-कुंकू समारंभ रथसप्तमीदिनी समाप्त होतात. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. भारतीय संस्कृतीतील व्रते, परंपरा यांचे केवळ अध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून, ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भारतीय संस्कृती निसर्गपूजक असल्याचे सांगितले जाते. निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. पैकी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा आहे. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमी आहे. रथसप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान, आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
रथसप्तमीच्या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करावा?
रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या या मंत्रांचा जप करा. यामुळे सूर्यासारखे तेज आणि उत्तम आरोग्य व आर्थिक स्थैर्य लाभते, अशी मान्यता आहे. जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम । तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम ।। हा नवग्रह स्तोत्रातील रविचा मंत्र आहे. या मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. याशिवाय, ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।, हा रविचा प्रभावी मंत्र मानला जातो. तसेच ॐ आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयत।।, हा रविचा गायत्री मंत्र आहे. याचा जप किंवा नामस्मरण करणे उपयुक्त मानले जाते. अर्घ्य अर्पण करण्यासह आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. पठण करणे शक्य नसेल, तर या स्तोत्राचे श्रवण करावे, असे सांगितले जाते.
रथसप्तमीच्या दिवशी नेमके काय करावे?
सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. स्नानानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. शक्य असल्यास नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाची पूजा करावी. अर्घ्य देताना सूर्य मंत्राचा जप करा. मनात काही किल्मिष असेल तर ते दूर सारून सूर्यदेवाला शरण जा. सूर्य देवाला तीळ आणि पाण्याचे अर्घ्य द्या. सूर्य उपासना सुरु करा आणि रथसप्तमीला सूर्यदेवाला खीरीचा नैवेद्य अर्पण करा. नदीत केलेले स्नान आणि जोडीला सूर्योपासना फायदेशीर ठरते. रथसप्तमीचा हा दिवस सूर्य उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. जे लोक या दिवसापासून सूर्याची उपासना करतात, त्यांची शक्ती, युक्ती, भक्ती वाढीस लागते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.