२१ वर्षांनी चमत्कार, स्वामींचा शब्द खरा ठरला; मंदार वृक्ष बहरला, सिद्धिविनायक सिद्ध झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 06:06 AM2024-03-28T06:06:06+5:302024-03-28T06:06:06+5:30

Siddhivinayak Temple And Swami Samarth Maharaj Katha: सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना, बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे, असे सांगितले जाते. एक प्रचलित कथा जाणून घ्या...

mumbai shree siddhivinayak temple and swami samarth maharaj katha unknown but rare amazing story | २१ वर्षांनी चमत्कार, स्वामींचा शब्द खरा ठरला; मंदार वृक्ष बहरला, सिद्धिविनायक सिद्ध झाला

२१ वर्षांनी चमत्कार, स्वामींचा शब्द खरा ठरला; मंदार वृक्ष बहरला, सिद्धिविनायक सिद्ध झाला

Siddhivinayak Temple And Swami Samarth Maharaj Katha: मुंबईतील सिद्धिविनायकाचा महिमा अगाध असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सिद्धिविनायकाला मनापासून आर्त साद घातली, तर तो भाविकांच्या हाकेला धावून येतो, नवसाला पावतो, अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्रीसिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते. सिद्धिविनायकाचे असीम भक्त असलेल्या रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काही न मागता आपल्या आराध्यासाठी मागितले आणि २१ वर्षांनी चमत्कार घडला. स्वामींचा शब्द खरा झाला, अशी एक कथा सांगितली जाते.

सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना, बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे, असे सांगितले जाते. सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून, उजव्या हातामध्ये कमळ व वरील डाव्या हातात अंकुश आहे. खालील उजव्या हातात मोत्यांची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र ठेवलेले आहे. गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रूळणारा सर्पहार आहे. दोन्हीं बाजूंना रिद्धी आणि सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पहात असल्याप्रमाणे दिसतात. तसेच सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो, असे म्हटले जाते. 

माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या

स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज जे श्रीगणेशाचे आणि गायत्री मंत्राचे मोठे भक्त होते, त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती, असे म्हटले जाते. अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक, रामकृष्णा, तुला काय हवे?, अशी विचारणा स्वामींनी केली. परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. ते स्वामींना म्हणाले की, स्वामी मला काही नको. तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या.

गारूड्यांचा खेळ मला दाखवतोस काय? आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे

जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले. लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील. एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या. ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली. गारूड्यांचा खेळ मला दाखवतोस काय? आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे, असा आदेश स्वामींनी दिला. त्यातील मुख्य दोन गोष्टी वगळून अन्य गोष्टी स्वामींनी आपले शिष्य व ज्यांच्या घरात स्वामी असत, त्या चोळप्पांच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या. उर्वरित, दोन गोष्टी नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्या समोर पुरून ये, असे सांगितले. जांभेकर महाराजांनी स्वामींनी सांगितले तसे केले.

२१ वर्षांनी मंदार वृक्ष उगवला, स्वामींचा शब्द खरा ठरला

जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थ सेवेला लागले. स्वामी समर्थां बरोबरच्या सहवासातील या काळात श्री.जांभेकर यांच्याकडे समर्थांनी असेही भाकित केले की २१ वर्षांनंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल. त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल. हा शब्द खरा ठरला आणि प्रभादेवीचा सिद्धिविनायक तेव्हापासून खऱ्या अर्थाने सिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

सिद्धिविनायकाचे वैभव अन् स्वामींचा शुभाशिर्वाद

याशिवाय, स्वामींनी रामकृष्णबुवांना आशीर्वाद दिला. म्हणाले की, मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे आणखी एक रोपटे लाव. मंदार वृक्ष इंचाइंचाने वाढेल, तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल. ज्या दिवशी मंदार बहरेल, त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल. स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशिर्वाद दिले. यानंतर भक्तांची संख्या वाढू लागली व लांबचलांब रांगा दिसू लागल्या.

रामकृष्णबुवा जांभेकर यांचे सिद्धिविनायकाला साकडे

स्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रामकृष्णबुवा जांभेकर मुंबीत प्रभादेवीला आले. प्रथम मंगळवारी मंदार वृक्षाचे एक रोपटे सिद्धिविनायक देवळाजवळ लावले. त्या ठिकाणी हात जोडून गणपती आणि स्वामींची प्रार्थना केली. स्वामी मी माझे काम केले. आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, असे आशीर्वचन मागितले. सिद्धिविनायकासमोर हात जोडून म्हणाले की, हे गजानना, स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो. या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवोत. त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असे साकडे रामकृष्णबुवांनी सिद्धिविनायकाला घातले, अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते.
 

Web Title: mumbai shree siddhivinayak temple and swami samarth maharaj katha unknown but rare amazing story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.