इये मराठीचिये नगरी, ब्रम्हविद्येचा सुकाळू करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 19:23 IST2020-06-13T19:20:50+5:302020-06-13T19:23:09+5:30

महाराष्ट्रातील सर्व संतांनी सिद्ध संघाचे वर्णन आपल्या अभंगात केले असल्याचे दिसून येते.

Iye marathichiye nagri, bramhavidyacha sukalu kari | इये मराठीचिये नगरी, ब्रम्हविद्येचा सुकाळू करी

इये मराठीचिये नगरी, ब्रम्हविद्येचा सुकाळू करी

आपल्या पृथ्वीतलावरील सर्व जीवांची उत्क्रांती चालू आहे, त्याची सूत्रे काही ऋषितुल्य महात्म्याच्या हाती आहेत, असे थिआॅसाफि सांगते.  प्रत्येक जीव हा त्या योजनेचा भाग आहे. अशा ऋषितुल्य जीवन्मुक्त महात्म्यांचा समुदाय असून, त्याल्याच सिद्धसंघ म्हटले आहे. थिआॅसोफिकॅल सोसायटीची स्थापना सिद्धसंघातील महात्मा कुथूमी व महात्मा मौर्य यांनी केली. ज्यांची संस्कृत नावे देवापी व मरु अशी आहेत. महाराष्ट्रातील सर्व संतांनी सिद्ध संघाचे वर्णन आपल्या अभंगात केले असल्याचे दिसून येते. संत ज्ञानेश्वरांनी त्यांना ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ या नावाने संबोधन केले आहे. सिद्ध संघातील ऋषींच्या आदेश्वारुप हे कार्य आम्ही करीत असल्याचे संत तुकाराम स्पष्ट सांगतात.
आम्ही वैकुंठ वाशी आलो
याची कारणाशी
बोलले जे ऋषी साच भावे वतार्या
झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग
उचीस्थाचा भाग शेष उरला तो सेऊ
भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणू लाथा
-संत तुकाराम
वास्तविक आम्ही वैकुंठात वास करणारे आहोत े(मुक्त आहोत); परंतु महान ऋषींनी जे प्रतिपादन केले आहे, त्यांचे पालन करण्यासाठी आम्ही या मृत्युलोकात आलो आहोत. त्यांनी जो मार्ग दाखविला आहे, तो स्वच्छ करण्याचे कार्य आम्ही करू. (संतांनी दाखविलेला मार्ग अजून स्पष्ट करून सांगू). विषय लोभामुळे पारमार्थिक साधने बुडवून टाकली जात आहेत. ज्ञान केवळ शब्दात आहे आचरणात मात्र शून्य आहे.
तुम्ही सनकादिक संत
म्हणविता कृपावंत
एवढा करा उपकार
सांगा देवा नमस्कार
माझी भाकावी करुणा
विनवा पंढरीचा राणा
तुका म्हणे मज आठवा
मूळ लवकरी पाठवा
-संत तुकाराम
वरील अभंगात संत तुकारामांनी सरळ सनकादिक मुनिंचा उलेख केला आहे. या अभंगावरून हेही लक्षात येते की, ते विश्वात्मक परमेश्वराला अत्यंत जवळचे, हृदयस्थ आहेत.ते सनकादिक संतांना विनंती करतात की, तुम्ही माझा देवाला नमस्कार सांगा, मजविषयी वैकुंठनाथाजवळ काकुळती करून विनंती करा आणि सांगा कि माझी आठवण करून मला बोलावणे पाठवा.
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
दैवताचे नाव सिद्धेश्वर
चौरंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा
तो सुख सोहळा काय वानू
नामा म्हणे देवा चला तया ठाया
विश्रांती घ्यावया कल्पवरी
-संत नामदेव
आळंदीला भगवान शंकराचे सिद्धपीठ आहे त्या ठिकाणी चौरंशी सिद्ध ऋषी एकत्र येतात.त्यांचा मोठा मेळावा भरतो. त्या मेळाव्याचे वर्णन मी काय करू तो अप्रतिम सोहळा असतो.

 - प्रा.डॉ.ए.एस.सोनोने 

Web Title: Iye marathichiye nagri, bramhavidyacha sukalu kari