>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
पूर्वीच्या काळी समाज प्रगत नव्हता, शहरीकरण झालेले नव्हते, समाज शिक्षित नव्हता आणि त्यामुळे वैचारिक प्रगती आजच्यासारखी नव्हती . विवाह हे पंचक्रोशीत किंवा नात्यातच होत असत. मुलामुलींच्या अगदी उमलत्या, कोवळ्या वयात संसाराला सुरवात होत असे. घरात पाच पंचवीस माणसे असत, सगळ्यांचा धाक, पण वय लहान म्हणून शिस्त असली तरी भरपूर लाड होत असत . माहेर सासर एकच वाटत असे. आईपेक्षाही त्या काळातील मुली सासू सोबत अधिक वर्ष घालवत असत.
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
पूर्वीच्या काळी साधे जीवन मग त्यात विवाह हा आजकालचा संगीत , मेहेंदी वगैरे सारखा सोहळा नसे. सर्व चालीरीतींना अनुसरून घरची मोठी मंडळी विवाह ठरवत आणि संपन्नही होत असत.
विवाहाशी संबंधित जुन्या पद्धती आणि निष्कर्ष : तेव्हा विवाह ठरवायच्या पद्धती सोप्या साध्या आणि मजेशीर होत्या . स्त्रिया हळद कुंकवाच्या पुड्या टाकत, जी पुडी उचलेल तिथे विवाह. पहिल्या ज्या स्थळाकडून होकार येईल तिथे मुलगी द्यायची असे ठरायचे. अनेकदा देवाला कौल लावून विवाह ठरत असत. मुलीसमोर शेतजमिनीची, गोठ्यातील, अग्निहोत्रातील, स्मशानातील, नापीक जमिनीतील, चव्हाट्याच्या जागेवरील, नदीच्या पात्रातील, जुगारी अड्ड्यावरील असे मातीचे गोळे आणून ठेवत आणि मुलीला त्यापैकी एक गोळा उचलायला सांगत.
मुलीने शेतजमिनीचा गोळा उचलला तर ती आल्यावर घरात अन्नाची बरकत येईल. गोठ्यातील गोळा उचलला तर गाई म्हशींची बरकत होईल. अग्निहोत्राचा गोळा उचलला तर घरातील धार्मिकता वाढेल, कुलाचार ,धर्म वाढेल. नदीच्या पात्रातील गोळा उचलला तर घरात पैशाचा ओघ राहील. पाणी म्हणजे जीवन, लक्ष्मी. जुगारी अड्ड्यावरील उचलला तर घरात भाऊबंदकी होईल. चव्हाट्या वरचा उचलला तर घरातील भांडणे चव्हाट्यावर जातील. नापीक जमिनीतला गोळा उचलला तर ती आल्यापासून लाभ होणार नाहीत . स्मशानातील उचलला तर वैधव्य लवकर येईल अशा समजुती असत आणि त्याप्रमाणे निर्णय होत असे.
Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या!
आजच्या आधुनिक काळात ह्या सर्व पद्धतीना आपोआपच तिलांजली मिळाली . आजचे जग प्रगत आहे . आजची मुले आणि मुलीही अगदी परदेशात सुद्धा एकटे राहतात , मोठमोठ्या पदांवर काम करून घाम फुटेल इतके मोठमोठे पगार सुद्धा कमावतात. त्यामुळे आता पूर्वीच्या विवाह पद्धती अर्थातच मोडीत निघाल्या आहेत पण विवाह संकल्पनेला निदान आज तरी पूर्णपणे सुरुंग लागलेला नाही.
आता मुलं-मुली बाहेरच भेटतात ,त्यांना आपण अनुरूप आहोत असे वाटले तर दोन कुटुंबे एकत्र भेटतात. लग्नातील देणीघेणी त्याच्या मोठमोठाल्या याद्या ह्या सुद्धा आता बाद झाल्या आहेत . आजच्या काळात दोघांचे एकमेकांशी जमणे आणि त्यांनी एका छताखाली आनंदाने राहणे हेच सर्वात महत्त्वाचे ठरत आहे. पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण आपण नेहमीच करत आलो आहोत .आपली विवाह संस्थाही त्याला अपवाद नाही . भारतात सध्या 'लिव इन रिलेशन' चे पेव फुटले आहे. मात्र त्याला अद्याप पूर्णतः मान्यता नाही. भारतीय मन असे नाते स्वीकारत नाही. याउलट मुलगा आणि मुलगी ह्यांनी विवाह करून एकत्र एका छताखाली आनंदात एकोप्याने राहणे हीच काळाची खरी गरज आहे. एखादी मुलगी छान नांदते तेव्हा आईवडील जावयाचे सुद्धा तितकेच कोडकौतुक करताना दिसतात. पण ते तसे एकत्र नांदावेत यासाठी कुंडली मिलन करताना मुख्य गुण दोष बघावे लागतात.
म्हणून योनिमैत्रीचा विचार अधिक स्पष्टपणे केला जातो. षडाष्टक योग टाळावा कारण त्याने शत्रुत्व येते म्हणून लग्न आणि चंद्र षडाष्टक टाळावे . सप्तमात २ शत्रू ग्रह आले तर वैवाहिक जीवनाची सुरवातच कटकटीतून होताना दिसते .तसेच अष्टमस्थानात सुद्धा शत्रूग्रह नकोत कारण ते लैंगिक सुखाचे स्थान आहे .
एक नक्षत्र आणि एकच चरण असेल तर विवाह करू नये एक नाडी दोष निर्माण होतो, त्यांना संतती होण्यास अडथळे येतात. पण ज्यांना संतती नकोच असेल अशांसाठी हे पहायची गरज नाही. त्यांनी विवाह करायला हरकत नाही . समाजात परंपरागत ज्या गोष्टी चालू आहेत त्या एकदम अचानक खोडून टाकणे जमत नाही त्यामुळे आपल्याला गुणमिलन सुद्धा करून द्यायला पाहिजे. किती गुण जुळतात तेही सांगायला लागते.
पूर्वीच्या काळी सगोत्र विवाह करावे का असा प्रश्न येई. पूर्वी पलीकडच्या वाडीत ,पेठेत , नात्यात ,आत्याकडे मावशीकडे मुलगी दिली जात असे. अशावेळी शारीरिक दोष निर्माण होत असत. त्यामुळे वैदिक शास्त्रात सगोत्र विवाह नको असे सुचवले जात असे. मात्र सद्यस्थिती वेगळी असल्याने पती पत्नी एकत्रपणे आनंदात राहणे ही काळाची गरज झाली आहे, त्यानुसार ज्योतिष शास्त्राची समीकरणेही बदलली आहेत.
Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!
विवाह कालही होत होते, आजही होत आहेत आणि भविष्यात सुद्धा होत राहतील. प्रश्न आहे तो कसे होतील आणि विवाहाची मूळ संकल्पना आपल्याच मातीत मूळ धरून टिकेल का?
संपर्क : 8104639230