मागील हंगामातील विमा रक्कम देण्याची मागणी : विमा उतरवणाऱ्यांची संख्या ६ लाखांनी घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी होतात. मोठ्या आशेने शेतकरी पीक विमा भरतात. मात्र मागील दोन वर्षापासून विमा रक्कम मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा भरणाऱ्या ६ लाख शेतकरी सभासदांची संख्या घटली आहे. मागील वर्षी तर फक्त २० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याप्रमाणे विमा कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, या मागणीसाठी विविध संघटना आंदोलन करीत आहेत.
..
फक्त २० हजार शेतकऱ्यांना मिळाली भरपाई
जिल्ह्यात २०२० खरीप हंगामात भारतीय कृषी विमा कंपनीकडे १७ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी फक्त २० हजार ५३० जणांना भरपाई मिळाली होती.
शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून कंपनीला ७९८ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला होता.
त्यापैकी फक्त २० हजार ५९ शेतकऱ्यांना १३ कोटी ४६ लाख नुकसानभरपाईपोटी मिळाले होते.
...
मागील वर्षीच्या तुलनेत विम्यासाठी कमी अर्ज
मागील वर्षी - १७५९००० यावर्षी ११५९३९२ ७४६०१५ एकूण खरीप क्षेत्र
विमा उतरवणारे शेतकरी सभासद ११५९३९२ शेतकऱ्याचा हप्ता ४३१८५३९१२ राज्य हप्ता ३०२७८०३९४२ केंद्र हप्ता २४५६०२५९६४ विमा क्षेत्र ४४८६८७ हेक्टर
विमा संरक्षण रक्कम १८४३ कोटी २४ लाख ९८ हजार ४०० रुपये
...
कृषी अधिकाऱ्याची प्रतिक्रिया
पावसाचे आगमन वेळेवर झाले असून, पेरणी व उगवण क्षमता देखील उत्तम असल्यामुळे पिकांची परिस्थिती यावर्षी चांगली आहे. त्यामुळे धोका असल्याचे दिसून आले नाही. या कारणामुळे पीकविमा उतरवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड.
.....
मागील वर्षी शासनाच्या पंचनाम्याप्रमाणे विमा द्यावा
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पीक काढणीला आलेले असताना गारपीट झाल्यामुळे हातचे पीक गेले होते. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार पीक विमा कंपनीने रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी अन्यथा आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
-कुलदीप करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष.
...
मागील दोन वर्षापासून जवळपास २० हजार रुपये पिकांच्या विम्यापोटी भरले आहेत. मात्र, दोन्ही नुकसान होऊन देखील लाभ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी विमा उतरवला नाही. पाऊस पण चांगला पडला असून,पिके जोमात आहेत.
-सतीश जगताप, शेतकरी.