बीड : पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना महागडा आय टॅब दिला असा दावा करण्यासह अनेकांवर आरोप करणाऱ्या सायबर ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले याला बडतर्फ केले. त्याच्यासोबत हवालदार आणि चालक असे दोघांचेही निलंबन झाले. एकाच ठाण्यातील तिघांवर गंभीर प्रकरणात कारवाई झाली, परंतू येथील ठाणेदार अजूनही बिनधास्त आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप होत आहे. कारवाईतील या दुजाभावामुळे पोलिस अधीक्षकांबाबत त्यांच्याच कर्मचाऱ्यांत नाराजी आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बीड पोलिस वादात सापडले. या प्रकरणात अधिकारी निलंबीत झाले. त्यानंतरही अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी आरोपींना मदत करत राहिले. नवनीत काँवत यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यावर थोडा वचक राहिल, असे वाटत होते. परंतू या अपेक्षा फोल ठरत आहेत. कारण आजही पोलिस अधिकारी, कर्मचारी गैरप्रकार करतच असल्याचे समोर आले आहे.
प्रमुखांसह एलसीबी शाखाच वादातस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख हे एलसीबीत आल्यानंतर ते कसे आले, याची कहाणी भाजपचे आ.सुरेश धस यांनी सांगितली होती. सोबतच त्यांच्या शाखेतील उपनिरीक्षक महेश विघ्नेंसह सानप व इतर कर्मचाऱ्यांवरही गंभीर आराेप केले. तसेच चोरी, घरफोडीचे गुन्हेही उघड करण्यात शाखा अपयशी ठरली. एखादी कारवाई केली की त्याचा बोभाटा केला जातो. न्यायालयाचा निकाल बदल प्रकरण, आठवले गँगमधील फरार आरोपी मोकाट, असे अनेक प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. याचा आढावा घेण्याऐवजी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून या शाखेला 'झकते माप' दिले जात असल्याचा आरोप होत आहे.
अहवाल दिला, पण पुढे काय?सायबर पोलिस ठाण्यातील कासले बडतर्फ तर हवालदार रामदास गिरी, चालक बळीराम भाग्यवंत यांचे निलंबण झाले. परंतू पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्यावर कसलीही कारवाई नाही. अधीक्षक काँवत यांनी गात यांचा अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविल्याचा दावा केला, मग पुढे कारवाई का नाही? असा प्रश्न आहे. महानिरीक्षकांकडून अभय दिले जात आहे का? असा प्रश्नही आहे.
पोलिस निरीक्षकांकडून एसपींच्या नावाचा गैरवापरअधीक्षक काँवत यांच्या नावाचा वापर करून पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयातून माध्यम प्रतिनिधींना बाहेर जा, असे फर्मान सोडले. यावर काँवत यांनी आपण असे काहीच सांगितले नाही, असे म्हणत हात झटकले. परंतू पुढे शेख यांना विचारण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. काँवत यांनी सोयीनुसार घेतलेल्या भूमिकेबद्दलही माध्यम प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला.