बीड : 'रौळसगाव ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक शिक्षण आणि अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी, नळपट्टी माफ करण्याचा ठराव करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी घेतली प्रतिज्ञा
पालक सभेत उपस्थित गावातील महिला, पुरुष तरुणांनी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या तळमळीला साथ देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात प्रतिज्ञा घेतली.
गावातील एकही विद्यार्थी बाहेरगावी शाळेत जाणार नाही
रौळसगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत २० जूनला झालेल्या पालकसभेत ग्रामस्थांनी घटत्या पटसंख्येविषयी चिंता व्यक्त केली.
जिल्हा परिषद शाळेतील सुविधा, शैक्षणिक गुणवत्तेबाबत शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता गंगाखेडकर, केंद्रप्रमुख आंधळे, ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे उजगरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्याध्यापक महेश मोटेंनी दिली.
गावातील इयत्ता पहिली ते सातवीतील एकही विद्यार्थी गावाबाहेरील शाळेत न जाता रौळसगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेईल. ज्यांनी बाहेर प्रवेश घेतले आहेत, त्या विद्यार्थ्यांना परत गावातील शाळेत आणण्याचे प्रयत्न करण्याबाबतही सूर उमटला.