शिरूरकासार : तालुक्यातील नांदेवली येथील काही लोकांनी शेतात जाणारा वडिलोपार्जित आणि गाव नकाशात दर्शवण्यात आलेला रस्ता अडवला असून हा रस्ता पूर्ववत मोकळा करून द्यावा या मागणीसाठी नांदेवली येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी तोडगा निघाला नव्हता.
नांदेवली येथील शेतात जाणारा एक शेत रस्ता रस्त्याच्या सुरुवातीस असलेल्या काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दगड, काट्या, झाडाच्या फांद्या टाकलेल्या आहेत. हा रस्ता बंद करण्यात आल्याने ३० शेतकऱ्यांची जमीन पडीक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे सुरू आहेत. नांगरणीचे काम संपले आहे मात्र, रस्ता अडवल्याने उपोषणार्थी शेतकऱ्यांची शेती कामे राहिली आहेत. नांगरणीसुद्धा झालेली नाही. जमिनी पडीक पडण्याची भीती तक्रारदार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रस्ता अडवल्याबाबत यापूर्वीदेखील अर्ज दिला होता. रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले होते, असे चंद्रकांत थिटे या उपोषणार्थीने सांगितले.
यापूर्वी आपण नांदेवलीत जाऊन रस्त्यासाठी जेसीबी आणण्याचे सांगितले होते. मात्र गावांत दुर्दैवी घटना घडल्याने सर्वजण तिकडे गेले होते. सोमवारी उपोषणार्थींनी अर्ज दाखल केलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांना सुनावणीसाठी तारीख दिलेली आहे. रस्ता अडवता येत नाही. याउपर संबधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी सांगितले.
===Photopath===
150621\15_2_bed_17_15062021_14.jpeg
===Caption===
शेतकरी उपोषण