लोकमत न्यूज नेटवर्क
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आजाराने बीड जिल्ह्यात डोके वर काढले होते. या आजाराचे तब्बल १६७ रुग्ण आढळले आहेत. यातील ३८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत, तर उपचारादरम्यान २६ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत या आजाराचे १०० रुग्ण उपचार घेत आहेत. हे सर्वच रुग्ण अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल आहेत.
कोरोना रुग्णांचा उच्चांक झाल्यानंतर जे रुग्ण गंभीर होऊन बरे झाले अशा काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याचे निदान झाले. त्यात यशस्वी उपचारानंतर ३८ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे यांनी दिली.
....
औषधांची कमतरता कायम
म्युकरमायकोसिसच्या आजारासाठी असणाऱ्या औषधांचा सध्याही तुटवडा आहे. ॲफ्टोटेरेसिन बी तसेच काही टॅब्लेटचीही कमतरता आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून रुग्णसंख्येनुसार तसेच ज्या रुग्णांना गरज आहे, अशा रुग्णांसाठी या औषधांचा पुरवठा केला जात आहे. अद्याप मुबलक प्रमाणात या आजाराची औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत आहे. सध्या १०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांकडून न्यायिक पद्धतीने औषधांचे वितरण केले जात आहे.
....
आठ जणांचा एक डोळा निकामी
कोरोनानंतर म्युकरमायकोसिस झालेल्या आठ रुग्णांचा एक डोळा निकामी झाला आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असून यातील काही जणांना सुटीही मिळाली.
....
म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
चेहऱ्यावर सूज येणे, दात ढिले होऊन दुखणे, खोकला, ताप येणे, डोळा लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, नाकातून पाणी गळणे, चेहऱ्याचा एक भाग सुजणे किंवा दुखणे आदी लक्षणे जाणवत असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे, त्यांनी अशी लक्षणे दिसल्यास काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय पोस्ट कोविड ओपीडीमध्ये किमान १५ दिवसाला जाऊन दाखवून तपासणी करून घ्यावी. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये ही ओपीडी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये तपासणी करून घेता येईल. तपासणी केल्यामुळे रोगनिदान होऊन वेळेत उपचार होतील, असे आवाहनही आरोग्य विभागाच्यावतीने केले आहे.
....
कोरोना होऊ नये म्हणून नियमित मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर पाळणे ही त्रिसूत्री आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग खंडित होऊ शकतो. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत असल्यास तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.
-डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई.
....
...ही घ्या काळजी
ज्यांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांना गालदुखी, डोकेदुखी, दातदुखी व डोळे दुखीचा त्रास जाणवत असेल तर त्यांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्यवेळी उपचार घेतल्यानंतर आजार लवकर बरा होतो.
....