- संताेष स्वामीदिंद्रुड : पतीसोबत असलेला कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आई-वडिलांना सिरसाळा येथे घेऊन गेलेल्या फरिदाचा देखील छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. रविवारी रात्री मेहकर-पंढरपूर पालखी महामार्गावरील तेलगाव ते नित्रुडदरम्यान झालेल्या अपघातात भाटवडगाव येथील फारूख चांद सय्यद व शबाना फारूख सय्यद आणि त्यांची मुलगी फरिदा अन्वर पठाण यांच्यासह रिक्षाचालक व त्याचा सहकारी असे पाच जण ठार झाले. 'रात्री उशीर झाला आहे, सकाळी जा', असे फरिदाच्या सासरच्या लोकांनी सुचविले होते. त्यांचे ऐकले असते आणि मुक्काम केला असता तर अपघाताचा काळ आणि वेळ आली नसती, अशी चर्चा सिरसाळा परिसरातील लोकांमध्ये ऐकायला मिळत होती.
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजलगावपासून जवळच असलेल्या भाटवडगाव येथील फारूख चांद सय्यद व शबाना फारूख सय्यद हे मुलगी फरिदा हिचा पतीसोबत असलेला वाद मिटविण्यासाठी तिच्या तीन मुलांसमवेत सिरसाळा येथे रविवारी आले होते. दिवसभरात वाद मिटला नाही. त्यामुळे फरिदा व तिचे आई-वडील निघण्याच्या तयारीत असताना उशीर झाला आहे, रात्री मुक्काम करून सकाळी जाण्याबाबत सासरच्या लोकांनी सुचविले. परंतु ते थांबण्याच्या मानसिकतेत नव्हते.
रात्री १० वाजेच्या सुमारास फारुख सय्यद यांनी सिरसाळा येथील ऑटोरिक्षा भाड्याने घेतला. फरिदाची तीनही मुले सिरसाळा येथे सोडली. त्यानंतर ते मुलगी फरिदा व पत्नी शबाना यांच्यासोबत भाटवडगावकडे निघाले. पुढे नित्रुड-तेलगावदरम्यान काळाने घात केला. टेम्पो व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात फरिदाचे वडील फारुख सय्यद, आई शबाना सय्यद, ऑटोचालक नोहिद शेख व त्याच्यासोबतचा फैजान सय्यद या चौघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी फरिदा अन्वर पठाण हिला माजलगाव येथील खासगी रुग्णालय व तेथून छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेदरम्यान तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सिरसाळा व भाटवडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.