Beed Police ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी नवनीत काँवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँवत यांची शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच आज रविवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. "शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी नीट पार पडणं, कायद्याचे राज्य प्रस्थापित करणं हे माझं ध्येय आहे. त्यामुळे शनिवार-रविवार असला म्हणून काही फरक पडत नाही. मी आता पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यांचं म्हणणं मी ऐकून घेणार, जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आणि लोकांची जी अपेक्षा आहे की जिल्ह्यातील परिस्थितीत सुधारणा झाली पाहिजे, त्यासाठी मी १०० टक्के प्रयत्न करणार," असं म्हणत काँवत यांनी बीडला गुन्हेगारीमुक्त जिल्हा करणार असल्याचं म्हटलं आहे.
बीडचा बिहार झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत प्रश्न विचारताच नवनीत कावत म्हणाले की, "वैयक्तिकरीत्या मी या गोष्टीशी सहमत नाही. कारण मी मानतो की, हे दोन्ही भारताचेच भाग आहेत. माझं लक्ष्य आहे की, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारली पाहिजे. लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल, यादृष्टीने काम केलं जाईल ," असं काँवत म्हणाले.
दरम्यान, "मी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नक्कीच मस्साजोग इथं जाऊन दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेईन आणि त्यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल," असं नवनीत काँवत यांनी सांगितलं आहे.
कोण आहेत नवनीत काँवत?
नवनीत काँवत हे २०१७ च्या आयपीएस बॅचचे आहेत. अधीक्षक म्हणून त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे. कायदा व सुव्यवस्थेसह जिल्हा शांत ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. काँवत यांना सायबर क्राईममध्येही काम करण्याची आवड आहे. त्यामुळे सायबर ठाण्यातील प्रलंबित गुन्हे आणि तक्रारींचा निपटारा होण्यासह मदत होणार आहे. त्यांना खेळ खेळणे, गाणे, नृत्य करणे याचाही छंद आहे. मुळचे अलवरचे (राजस्थान) रहिवासी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सैनिक स्कूल चित्तोडगड, राजस्थान येथे झाले. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, आयआयटीमध्येही पदवी घेतलेली आहे सम टोटल सिस्टम्स, हैदराबाद २०१२-२०१३ मध्ये सॉफ्टवेअर अभियंता, भारतीय रेल्वे २०१५- २०१६ मध्ये आयईएस अधिकारी, आयकर विभागात २०१६-२०१७ मध्ये आयआरएस अधिकारी म्हणून नोकरीचा अनुभव आहे. २०१७ साली ते आयपीएस झाले. लोणावळा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी, धाराशिवला अपर पोलिस अधीक्षक आणि आता छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचे काम समाधानकारक होते. त्यांनी क्यूआर कोडवर आधारित नागरिकांचा अभिप्राय आणि तक्रार नोंदवण्याची यंत्रणा सुरू केली आहे. तसेच डीसीपी कार्यालयात स्वतः तक्रारदाराशी २४ तासांत संपर्क करत होते.
बीडमधील आव्हान
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर अनेक घटना, घडामोडी जिल्ह्यात घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हेच सर्व मुद्दे आ. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित यांच्यासह इतर आमदारांनी उपस्थित केले होते. याच अनुषंगाने शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शनिवारी दुपारी लगेच नवनीत काँवत यांची नियुक्ती करण्यात आली. काँवत हे छत्रपती संभाजीनगर शहरात झोन २ ला उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तेथेही त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केलेल्या आहेत. आता अधीक्षक म्हणून त्यांची पहिलीच पोस्टिंग आहे. त्यामुळे जिल्ह्याला त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा आहेत. तसेच थेट आयपीएस आणि तरुण अधिकारी मिळाल्याने जिल्ह्यातील अवैध धंदे गंदाराज ताल माफियांची दादागिरी संपुष्टात येईल, अशी आशा आहे.