९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे करून मुख्यमंत्री महाजनादेश मागणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:34 AM2019-08-25T00:34:15+5:302019-08-25T00:34:57+5:30

भाजप-सेनेच्या सोळा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची २२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या मंत्र्यांनी ९० हजार कोटींचे घोटाळे केले आहेत. हा एवढा भ्रष्टाचार समोर असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महाजनादेश मागणार? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

How will the Chief Minister ask for a Mahajanesh by scam worth Rs. | ९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे करून मुख्यमंत्री महाजनादेश मागणार कसा?

९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे करून मुख्यमंत्री महाजनादेश मागणार कसा?

Next
ठळक मुद्देअमोल कोल्हे । अंबाजोगाईत शिवस्वराज्य यात्रेनिमित्त निघाली मोटारसायकल रॅली

अंबाजोगाई / माजलगाव : भाजप-सेनेच्या सोळा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची २२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या मंत्र्यांनी ९० हजार कोटींचे घोटाळे केले आहेत. हा एवढा भ्रष्टाचार समोर असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महाजनादेश मागणार? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निघालेली शिवस्वराज्य यात्रा शनिवारी सकाळी अंबाजोगाईत पोहचली. अंबाजोगाई शहरातून निघालेल्या भव्य मोटारसायकल रॅलीनंतर मोंढा मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खा. डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, नंदकिशोर मुंदडा, नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. कोल्हे म्हणाले की, फडणवीस सरकार पूर्ण पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारने सामान्य जनतेच्या अपेक्षांचा कडेलोट केलाय. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात सोळा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. राज्यात मुख्यमंत्र्यांचं गाव नागपूर हे क्राईम कॅपिटल झालंय. गेल्या पाच वर्षात राज्यात एक लाख २५ हजार महिलांवर अत्याचार झाले. १६ हजार ५०० महिलांवर बलात्कार झाले. ३७ हजार महिलाचा विनयभंग झाला. अशी स्थिती असतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. असं कसं म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात किळसवाणे राजकारण सुरू केले आहे. विरोधकांना ईडी, न्यायालय, सीबीआयच्या धमक्या दाखवून पक्षांतर करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. ज्यांनी सत्ता भोगली, पदे भोगली ते आता पक्ष सोडून जात आहेत. परंतु अशा गयाराम लोकांमुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही, असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, एअर स्ट्राईकमध्ये लोकसभा घालविली आता पुन्हा ३७० कलमामध्ये विधानसभा घालवू नका. नाही तर आपलं पुन्हा वाटोळं होईल. भाजपा-सेना हा फसव्यांचा पक्ष आहे. केवळ थापा मारून त्यांनी पाच वर्षे घालविली. कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. दुष्काळात शेतकऱ्यांना वाºयावर सोडले. अशा या थापाड्या सरकारला सत्तेपासून खाली खेचा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना नमिता मुंदडा म्हणाल्या की, केज विधानसभा मतदारसंघ व मुंदडा परिवार यांचे कौटुंबिक नाते आहे. हे नाते जोपासून मतदारसंघाला न्याय देण्यासाठी मी विमलताईंचा वारसा खंबीरपणे जोपासेल. त्यांचे अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे अधुरे राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. यावेळी बोलतांना अक्षय मुंदडा म्हणाले की, कसलेही पद नसतांना गेल्या सात वर्षांपासून जनतेच्या आशीवार्दामुळे व प्रेमामुळे आम्ही राजकारणात टिकून आहोत. विमलताई मुंदडा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जे स्थान निर्माण केले. त्याचा मोठा फायदा केज मतदारसंघाच्या विकासासाठी झाला. जिल्हा निर्मितीसाठी लागणारी सर्व कार्यालये आज अंबाजोगाईत आहेत. मात्र, केज विधानसभा मतदारसंघ हा गेल्या पाच वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. याच इमारतींना रंग देऊन उद्घाटने करण्याचा खटाटोप सुरू आहे. आमदारांनी दुष्काळासंदर्भात एकही बैठक घेतली नाही. अथवा दुष्काळात होरपळणाºया शेतकºयांसाठी चाराछावण्या सुरू केल्या नाहीत, असे विविध आरोप अक्षय मुंदडा यांनी यावेळी केले.
वृक्षारोपणाची चळवळ गतिमान करण्यासाठी नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघात ५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करून सभेसाठी आलेल्या कार्यकर्ते व शेतकरी यांना ५ हजार वृक्षांचे वाटप केले. शिवस्वराज्य यात्रा अंबाजोगाई शहरात सकाळी १० वाजता दाखल झाली. या मोटारसायकल रॅलीत २ हजारांपेक्षा जास्त मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते.
माजलगावात स्वागत
शिवस्वराज्य यात्रेचे माजलगाव शहरात शुक्र वारी दुपारी ४ वाजता आगमन झाले. परभणी चौफाळा येथून दुचाकी रॅलीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर मोंढा मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. डॉ.अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अमोल मिठकरी, माजी मंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अमरसिंह पंडित, अशोक डक, जयसिंह सोळंके, रमेश सोळंके, शेख मंजुर आदी उपस्थित होते.
पार्सल परळीला पाठविणार
माजी मंत्री प्रकाश सोळंके म्हणाले की, माजलगाव मतदार संघातील जनतेला गोडबोलून आलेले परळीचे पार्सल जनता वापस पाठवणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव नॉटरिचेबल आमदार म्हणून आ.आर.टी.देशमुखांनी ख्याती मिळवली. भाजपाकडून आपल्यालाच उमेदवारी म्हणत गावोगावी देशमुख-आडसकर-जगताप हे नाचत फिरत आहेत. आता उपºयांना उमेदवारी मिळणार नसून भाजपाकडून ओमप्रकाश शेटेच उमेदवार असल्याचे प्रकाश सोळंके म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ही भाषण झाले. सूत्रसंचालन कचरु खळगे, आभार प्रदर्शन बाजार समिती सभापती अशोक डक यांनी मानले.

Web Title: How will the Chief Minister ask for a Mahajanesh by scam worth Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.