लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील मोंढ्यात नगरपालिकेने बांधलेल्या पुलाला नाली साफ करण्यासाठी ठेवण्यात आलेला खड्डा उघडाच असल्याने तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या खड्ड्यात दररोज वाहन चालक पडत असून जखमी होत आहे. याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील परभणी फाट्याकडून मोंढ्यात येणारा पूल पडलेला होता. यामुळे या नालीतील घाण पाणी रस्त्यावर वाहू लागले होते. अनेक जण या पुलात पडले असताना व व्यापाऱ्यांनी वारंवार नगरपालिकेकडे पूल दुरुस्त करण्याची मागणी केली होती. अनेक वेळा मागणी केल्यानंतर हा पूल बांधण्यात आला. या पुलाखालील घाण स्वच्छ करण्यासाठी ऐन मध्यभागी एक मोठा खड्डा ठेवण्यात आला आहे. त्यावर कसल्याही प्रकारचे झाकण लावण्यात आलेली नाही. हा रस्ता रहदारीचा असल्याने मोठी वाहने या ठिकाणाहून ये-जा करीत असतात. यामुळे या खड्ड्यात दररोज अनेक वाहने व पायी चालणारे नागरिक पडत असतात. या पडून अनेकांना मुक्कामार लागलेला आहे. तर वाहनांचे देखील मोठे नुकसान होत आहे. याबाबत अनेक वेळा पालिकेकडे तक्रारी केल्या तरी त्याचा उपयोग झाला नाही. तरी हा खड्ड्यावर तातडीने झाकण टाकावे. अन्यथा नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.