जिल्ह्यात रविवारी बाधितांचा आकडा तीनशे पार गेला होता, तर सोमवारीही दोनशेहून अधिक रुग्ण आढळले. मागील दोन दिवसांत पाचशेहून जास्त रुग्ण आढळल्याने जिल्ह्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मृत्युसत्रही कायम आहे. सोमवारी जिल्ह्यात २ हजार १७९ जणांची कोरोना चाचणी केली गेली. यापैकी १ हजार ९४० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर २३९ जण बाधित आढळून आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ४३, आष्टी तालुक्यात १५, बीडमध्ये सर्वाधिक १०६, धारुरमध्ये १२, गेवराईत १०, केजमध्ये २०, माजलगावात ११, परळीत १५, पाटोद्यात ०२, शिरुरमध्ये ०३ तर वडवणीत २ नवे रुग्ण आढळून आले.
दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील ८२ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला, तर परळी तालुक्यातील दैठणा येथील ३५ वर्षीय महिलेच्या मृत्यूचीही नोंद झाली. दिवसभरात २२६ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २२ हजार ५९२ इतका झाला असून, २० हजार ६६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ६०३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.