लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहर व परिसरात मागील ५ ते ६ दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासाठी राखीव असलेला काळवटी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. बुधवारी सकाळपासून या तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या आठवड्यातच हा तलाव ओव्हरफ्लो होण्याची ही गेल्या कित्येक वर्षानंतर पहिलीच वेळ आहे. यामुळे अंबाजोगाईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
अंबाजोगाई शहराला मुख्यत्वे धनेगाव धरणातून पाणीपुरवठा होतो, तेथून पाणीपुरवठा थांबल्यास शहरासाठी राखीव असलेल्या काळवटी तांडा येथील साठवण तलावातून अंबाजोगाईकरांची तहान भागवली जाते. त्यामुळे काळवटी साठवण तलावाचे अंबाजोगाईकरांसाठी अनन्य साधारण महत्व आहे. या तलावाची साठवण क्षमता १.४१ दशलक्ष घनमीटर एवढी असली तरी हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास अंबाजोगाईला या तलावाचे पाणी किमान सहा महिने पुरते. त्यामुळे हा साठवण तलाव पावसाळा सुरू झाल्यानंतर महिनाभरातच भरल्यामुळे अंबाजोगाईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
...
डोंगररांगा हिरवाईने नटल्या
दरम्यान, यंदा जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस पडत असल्याने शहर व परिसरातील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. त्यामुळे बुट्टेनाथ, नागनाथ, काळवटी तांडा हा परिसर सौंदर्याने नटला असून निसर्ग प्रेमींना खुणावत आहे.