पूर्वी आषाढी वारीमुळे परळीमार्गे निघणाऱ्या दिंड्यांमुळे एक महिना हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदंगांचा निनादामुळे परळी शहर चैतन्यमय असते; परंतु कोरोना महामारीने गेली दोन वर्षे झाली पंढरपूरकडे जाणारी वारी दिंडी बंद असल्याने भाविक या भक्ती अमृतरसाला मुकले आहेत. त्यात प्रभू वैद्यनाथ मंदिरही फेब्रुवारीपासून बंद आहे. अगोदरच नैराश्यात असणारे लोक या धार्मिक बंधनामुळे अधिक गर्तेत अडकत आहेत. शासनाने काही नियम व अटी घालून मंदिर उघडे करावे, अशी मागणी भाविक गोपाळ आंधळे यांनी केली आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेऊन वारकरी परळीमार्गे पंढरपूरला आषाढी वारीला जातात. परळीमार्गे दिंड्या विदर्भातून मोठ्या प्रमाणात येत असत. श्री संत गजानन महाराज दिंडी, गुलाब महाराज दिंडी, नामदेव महाराज दिंडी, संत जनाबाई दिंडी यासह विदर्भ, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतून परळीमार्गे पंढरपूर आषाढी एकादशीला अनेक दिंड्या जातात; परंतु शासनाने कोराेनाच्या पार्श्वभूमीवर या दिंड्यांना परवानगी दिलेली नाही. हे दुसरे वर्ष आहे. त्यामुळे दिंडी येत नाही, त्यामुळे भाविकांमध्ये बेचैनीची भावना तयार झाली. शासनाचे नियम असल्यामुळे पाळावे लागत आहेत.
- रामेश्वर महाराज कोकाटे, संगम. ता. परळी
आषाढी वारीला विदर्भातून येणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांची भोजन व राहण्याची सोय वैद्यनाथ मंदिरात श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात येत होती; परंतु गेल्या दोन वर्षांपासून दिंड्या येत नसल्याने मंदिर परिसर भक्तांविना सुनासुना झाला आहे.
राजेश देशमुख, सचिव, वैद्यनाथ मंदिर, परळी