(Image Credit : osimint.com)
केसगळतीची समस्या आता ही केवळ वाढत्या वयासोबत येणारी समस्या राहिली नाही. कमी वयातही अनेकांना केसगळतीची समस्या भेडसावत आहे. ही केसगळती थांबवण्यासाठी लोक मग वेगवेगळी औषधे आणि शॅम्पूंचा वापर करतात. पण काहींना याचा फायदा होतो तर काहींना होतोच असं नाही. केसगळतीची कशी वेगवेगळी कारणे आहेत. ही कारणे न जाणून घेता अनेकजण स्वत:च्या मनाने उपाय करत असतात.
काही लोकांची होणारी केसगळती ही आनुवांशिक कारणामुळे होत असते. तर काही लोकांना केसगळती ही शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे नसल्याने होत असते. तसेच वाढत्या प्रदूषणाच्या वातावरणात केसगळती थांबवणे तसे कठीणच काम.
मात्र काही नैसर्गिक उपायांनी केसगळती थांबवली जाऊ शकते असा दावा वेळोवेळी केला जातो. द हेल्थ साइट डॉट कॉम ने दिलेल्या माहितीनुसार, आयुर्वेदातील एका खास उपायाने केसगळती थांबवली जाऊ शकते. चला जाणून घेऊ काय आहे हा उपाय.
बीटाची पाने
बीट हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे तुम्हाला माहीत असेलच. डॉक्टरही अनेकदा बीट खाण्याचा सल्ला देतात. तसेच शरीरातील रक्त वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या बीटाने केसांनाही फायदा होतो. बीटाच्या पानांच्या मदतीने केसगळती रोखण्यास मदत मिळते. सोबतच याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं. त्यामुळे चला जाणून घेऊ केसगळती थांबवण्यासाठी बीटाच्या पानांचा वापर कसा करावा.
आवश्यक साहित्य
४ ते ५ बीटाची पाने
१ चमचा हिना
कसं कराल तयार?
- एका भांड्यात थोडं पाणी घ्या आणि त्यात बीटाची पाने टाकून उकडू द्या. भांड्यातील पाणी अर्ध होईपर्यंत हे उकडू द्या.
- त्यानंतर पाण्यातून बीटाची पाने बाहेर काढा आणि त्यात एक चमचा हिना टाकून चांगलं मिक्स करा.
- ही तयार झालेली पेस्ट केसांच्या मुळात लावा.
- पेस्ट केसांना जवळपास २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा.
- नंतर केस साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवून घ्या.
बीटाचे फायदे ?
बीट आणि हिनाची पेस्ट आठवड्यातून दोनदा केसांना लावा. बीटाची पेस्ट लावण्यासोबतच तुम्ही बीटाचं नियमित सेवनही करू शकता. बीटामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी असतात. जे शरीराला पोषण देण्यासोबतच केसांनाही पोषण देण्याचं काम करतात.
(टिप : वरील उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा किंवा शरीराची रचना वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)