गाडीसाठी पाण्याचा अपव्यय टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 18:35 IST2017-07-31T18:33:58+5:302017-07-31T18:35:16+5:30
आपली कार चकाचक असावी असे वाटणं साहजिक आहे, पण सध्या पाण्याचे असणारे महत्त्व लक्षात घ्या. त्यामुळे पाण्याचा वापर कार धुण्यासाठी करताना जपूनच करा. आज पाणी वाचवाल तर उद्या पाणी मिळणार आहे.

गाडीसाठी पाण्याचा अपव्यय टाळा
आपली कार चकाचक असावी असे वाटणं साहजिक आहे, पण सध्या पाण्याचे असणारे महत्त्व लक्षात घ्या. त्यामुळे पाण्याचा वापर कार धुण्यासाठी करताना जपूनच करा. आज पाणी वाचवाल तर उद्या पाणी मिळणार आहे. आवश्यकता नसल्यास कार धुतली नाही तर काही फरक पडणार नाही. पावसाळ्यामध्ये रोज कार वापरणाऱ्यांना तर आपली कार बाहेरून खराब झाली आहे असे दिसले की लगेच ती पाण्याने धुवायची लहर येते. अगदी दुसऱ्या दिवशी कारने कुठेही जाणार नसला तरी कार धुण्याचा परिपाठ करणारे लोक कमी नाहीत. खरे म्हणजे तुमच्या कार धुण्यामुळे कारची ताकद व कार्यक्षमता वाढणार नसते. शहरांमध्ये अनेक जण सकाळी कार स्वत: हून धुतात किंवा रोज त्याकामासठी माणूस नेमतात. खरे म्हणजे कार स्वच्छ असली तरी नित्याने रोज ती धुवायला हवी असा दंडकच जणू काही लोकांनी घालून घेतलेला असतो.
पाणी हे जीवन आहे. अनेक ठिकाणी महापालिका किंवा नगरपालिका पाणी पुरवठा करतात ते पाणी पिण्याचे असते. त्यामुळे तसे पाणी बिनदिक्कतपणे कार धुण्यासाठी वापरण्यापूर्वी दहावेळा विचार करा. वैयक्तिक वापराची कार रोजच्या रोज स्वच्छ ठेवण्यासाठी काही गोष्टी करा. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल. रोज साध्या फडक्याने वा बाहेर विकत मिळणाऱ्या मायक्रो फायबरच्या ब्रशने कार साफ करा. त्यानंतर बाटलीचा स्प्रे वापरून त्याद्वारे साध्या पाण्याचा मारा कारच्या पृष्ठभागावर करा व लगेच स्पंज वा ओलसर फडक्याने पुसून घ्या व लगेच सुक्या फडक्याने पुसून घ्या. थोडे कष्ट जास्त पडतील पण तेवढाच व्यायामही होईल व पाण्याचा अनावश्यक वापर वाचेल. दररोज अशा प्रकारे केल्यास किंवा दिवसाआड अशी गाडी स्वच्छ केल्यास पाणीही वाचेल. जास्तीतजास्त दोन लीटर पाण्यात गाडी स्वच्छ होईल. गाडी अधिक खराब असेल तर महिन्यातून एकदा वॉशिंग सेंटरवर नेऊन धुऊन घेता येईल. पावसाळ्यात कितीही रोज गाडी धुतली तरी खराब होणारच आहे. ग्रामीण भागात गेल्यानंतर परत शहरात येताच गाडी घुवून व क्लिनिंग करून घ्या, त्यामुळे चिखल, धूळ यापासून गाडी मुक्त होईल. अर्थात रोज कार्यालयात गाडी घेऊन जाणाऱ्याना त्यांच्या प्रेस्टिजप्रमाणे गाडीवर खर्च करायला लागत असेल तर तो भाग वेगळा. व्यावसायिक वापर असलेल्यांना गाडी स्वच्छ व चकाचक ठेवावी लागतेच त्याला मात्र इलाज नाही. परंतु वैयक्तिक व दररोज वापर न करणाऱ्यांना अनावश्यक पाणी वापरणे टाळता येऊ शकते.