जिल्हा परिषद आवारात सुरक्षा होणार भक्कम
By Admin | Updated: July 21, 2015 00:28 IST2015-07-21T00:28:47+5:302015-07-21T00:28:47+5:30
स्थानिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे.

जिल्हा परिषद आवारात सुरक्षा होणार भक्कम
प्रशासन : सीईओ करणार उपाययोजना, चोरट्या मार्गावर राहणार रक्षकांची नजर
अमरावती : स्थानिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. मोटारसायकल चोरीसह सायकलचोरीच्या घटना वाढू लागल्याने नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने वाहनांना बंदिस्त पार्किंग करण्याबरोबरच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे.
मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत चोरट्यांचा अनेक दिवसांपासून सुळसुळाट झाला आहे. भंगार साहित्यासह उभ्या असलेल्या वाहनांच्या साहित्याचीही चोऱ्या झालेल्या आहेत. यासोबत कार्यालयातील संगणक चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशातच जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांची आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकली जिल्हा परिषद आवारात उभ्या केल्या जातात. मात्र मिनी मंत्रालयाचा परिसरातून दुचाकी वाहने चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांवर आळा बसावा म्हणून लवकरच जिल्हा परिषदेच्या आवारात सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सोबत सर्व बाजुंनी चोरट्यांचा या प्रकारावर कडक नजर सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून ठेवण्याचा निर्णय सीीओ सुनील पाटील यांनी घेतला आहे. त्यांनी पदभार स्वीकारुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अशातच आठ ते पंधरा दिवसातच आवारातून मोटारसायकल लंपास केली आहे. या घटनेने जिल्हा परिषदेत चोरटे सक्रिय असल्याचे सिद्ध होते. या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनांची दखल घेत नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुरक्षेवर विशेष खबरदारी घेतलेल आहे. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेत असलेली असुरक्षित व अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात काही वर्षापूर्वी साकारण्यात आलेल्या सभापतीच्या दालनासमोर बांधकाम विभागसमोर आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या बाबींवरही देणार सुरक्षेसाठी लक्ष
जिल्हा परिषदेत अनेक जण विनाकारण भटकंती करीत असतात. यावर पर्याय म्हणून सर्व छुपे रस्ते बंद करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, चहूबाजुंनी व मुख्य बाजूला लावले जाणार आहेत. जिल्हा परिषदेत दोन्ही गेटपैकी एका गेटने दुचाकींना येण्यासाठी व जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेसाठी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यासाठी पार्किंगची सुविधा करण्यात येईल. दरम्यान याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल.
-सुनील पाटील, सीईओ, जि.प.