अन्यायाविरुद्ध पालकांचे जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन
By Admin | Updated: May 13, 2015 00:31 IST2015-05-13T00:31:55+5:302015-05-13T00:31:55+5:30
अचलपूर तालुक्यातील असदपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता २ री ची विद्यार्थिनी धनश्रीचे शैक्षणिक नुकसानीला जबाबदार शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ऐन परीक्षा कालावधीत मुलीला बेदखल केले.

अन्यायाविरुद्ध पालकांचे जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन
अमरावती : अचलपूर तालुक्यातील असदपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता २ री ची विद्यार्थिनी धनश्रीचे शैक्षणिक नुकसानीला जबाबदार शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ऐन परीक्षा कालावधीत मुलीला बेदखल केले. त्यामुळे शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवल्याने या अन्यायाविरोधात मंगळवार १२ मे रोजी मुलींचे पालक विजय देवराव बडवाईक यांनी जिल्हा परिषदेसमोर न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
विजय बडवाईक यांची ७ वर्षांची मुलगी धनश्री ही असदपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता २ री मध्ये शिक्षण घेत होती. मात्र तिला ऐन परीक्षेच्या तोंडावर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक धुर्वे व शिक्षक गनानन पाथरे यांनी बेदखल करीत मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवले. यामुळे पालक असलेल्या विजय बडवाईक यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अन्यायाविरुद्ध विजय बङवाईक यांनी सीईओंकडे तक्रारही केली आहे. त्यामुळे संबंधित विभागाची अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बडवाईक यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी न्याय देण्यात यावा यासाठी बडवाईक यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.