तिवस्यात ‘झेंडूबाम’ आंदोलन
By Admin | Updated: September 8, 2016 00:13 IST2016-09-08T00:13:03+5:302016-09-08T00:13:03+5:30
येथील बसस्थानकातील अस्वच्छता व त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, नागपूरला जाणाऱ्या विनाथांबा फेऱ्यांमुळे कमी झालेले...

तिवस्यात ‘झेंडूबाम’ आंदोलन
निषेध : विनाथांबा बसफेऱ्या बंद करा
तिवसा : येथील बसस्थानकातील अस्वच्छता व त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, नागपूरला जाणाऱ्या विनाथांबा फेऱ्यांमुळे कमी झालेले नियमित सेड्यूल याचा निषेध बुधवारी करण्यात आला. तिवसा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष वैभव वानखडे आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘झेंडू बाम’ आंदोलन केले. यावेळी बसस्थानक प्रमुख व प्रवाशांना ‘झेंडू बाम’चे वाटप करण्यात आले. या आगळ्यावेगळा आंदोलनाची तिवस्यात जोरदार चर्चा रंगली.
राष्ट्रीय महामार्गावर तिवसा हे तालुक्याचे मुख्यालय असतानाही येथे आगार न करता बसस्थानक आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना बसफेऱ्या नाहीत. विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. बसस्थानक व परिसराची नियमित सफाई होत नाही. सुरक्षा रक्षकाचा अभाव असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच सायंकाळनंतर येथे प्रवाशांचा सदैव जीव धोक्यात राहतो. रात्री अंधाराचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार येथे सुरू राहतात.
एसटी महामंडळाविरुद्ध आंदोलन
तिवसा : अमरावती ते नागपूर दरम्यान डझनावरी विनाथांबा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. या बसेस येथे थांबत नाही. परिणामी शिक्षणासाठी अमरावतीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार निवेदन देऊनही महामंडळाचे धोरण बदलले नाही. त्यामुळे जनतेची डोकेदुखी वाढविणाऱ्या मंडळाच्या बेपर्वा कारभाराचा निषेध म्हणून ‘झेंडू बाम’ आंदोलन करण्यात आले. येथील बसस्थानक प्रमुख प्रतिक मोहोड यांच्यासह प्रवाशांना ‘झेंडूबाम’ वाटप करण्यात आले. यावेळी नरेंद्र विघ्ने, मधुकर भगत, सागर राऊत, प्रथिक शापामोहन, अंकुश देशमुख, गौरव उके, प्रसाद राजुरकर, शिवा शापामोहन, अतुल देशमुख आदी उपस्थित होते.