वीजबिल माफीसाठी युवा स्वाभिमानचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:40+5:302021-02-14T04:13:40+5:30
मोर्चेकऱ्यांना गर्ल्स हायस्कूल चौकात रोखले, वाढीव देयकांची केली होळी अमरावती : लॉकडाऊनंतर वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या अवास्तव वीज ...

वीजबिल माफीसाठी युवा स्वाभिमानचा मोर्चा
मोर्चेकऱ्यांना गर्ल्स हायस्कूल चौकात रोखले, वाढीव देयकांची केली होळी
अमरावती : लॉकडाऊनंतर वीज ग्राहकांना देण्यात आलेल्या अवास्तव वीज बिलात ५० टक्के माफी देण्याच्या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला.नियोजनानुसार पालकमंत्र्यांच्या घरावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकात थांबविला. त्यानंतर एक शिष्टमंडळ निवेदन देण्याकरिता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानपर्यंत पोहोचले.
२४ मार्च २०२० पासून देशभरात कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. या कालावधीत अनेकांचे रोजगार गेले. अनेकांच्या नोकरीवर गंडांतर आले. असे असताना नागरिकांना विजेची अव्वाच्या सव्वापट्टीने वीजबिले देण्यात आली. मात्र, शासनाने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्याचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहोचविण्यासाठी युवा स्वाभिमानने आमदार रवि राणा, खासदार नवनित राणा यांच्या मार्गदर्शनात वीज देयके माफीसाठी १३ फे्ब्रुवारी रोजी इर्विन चौकातून काढला.वीजबिल माफी झाली पाहिजे, आघाडी सरकारचा निषेध असो, अशा आशयाचे फलक हातात घेऊन घोषणा देत महिला व पुरुषांसह युवा कार्यकर्ते पुढे मार्गस्थ झाले. गर्ल्स हायस्कूल चौकात पोलिसांनी बॅरिकेडिंग करून मोर्चेकऱ्यांना रोखले. पुढे जाण्यासाठी परवानगी नाही. १० जणांचे शिष्टमंडळ निवेदन देण्यास पालकमंत्र्यांच्या घरी जाऊ शकता, असा प्रस्ताव पोलिसांनी दिला. पदाधिकाऱ्यांनी तो स्वीकारला. याच कालावधीत कार्यकर्त्यांनी नारेबाजी करीत वीज देयकांच्या झेराॅक्स प्रतिची होळी केली. पोलिसांच्या वाहनातूनच प्रमुख कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. पालकमंत्री मुंब्ईत असल्याने त्यांच्यावतीने ओएसडी प्रमोद कापडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसच्या दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर, हरिभाऊ मोहोड, अनिकेत देशमुख आदींनी निवेदन स्वीकारले.
बॉक्स
न्याय देण्याची मागणी
आमच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी शासन दरबारी पोहोचवून न्याय द्यावा, अशी विनंती युवा स्वाभिमानच्यवतीने करण्यात आली. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दूधाने, संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, विनोद जायवाल, ज्याेती सैरिसे, विनोद गुहे, सुमती ढोके, आशिष गावंडे, सपना ठाकूर, मयुरी कावरे, मुकसुद, वर्षा पकडे, अभिजित देशमुख, पराग चिमोटे, अनिल मिश्रा, अनुप अग्रवाल, नीलेश भेंडे, गणेश मारोडकर, रवि अडोकार व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.