यंदा नैसर्गिक आपत्तीचे १९ बळी
By Admin | Updated: August 9, 2016 00:14 IST2016-08-09T00:14:22+5:302016-08-09T00:14:22+5:30
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने ३१ जणांचा बळी गेला. ६ जण गंभीर झालेत, तर १,२८४ घरांची पडझड झाली व १,२२३ कुटुंबे बाधित झाली आहेत.

यंदा नैसर्गिक आपत्तीचे १९ बळी
३१ जनावरे मृत : १,२२३ कुटुंबे बाधित, १२८८ घरांची पडझड
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने ३१ जणांचा बळी गेला. ६ जण गंभीर झालेत, तर १,२८४ घरांची पडझड झाली व १,२२३ कुटुंबे बाधित झाली आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर येणे, वीज पडणे, अंगावर भिंत पडणे या नैसर्गिक आपत्तीमध्ये ३१ जणांना जीव गमवावा लागला. या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील ८६ गावे बाधित झालीत. यामध्ये १,२२३ नागरिकांना आपत्तीची झळ पोहोचली. घरात पाणी शिरल्याने या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. ६ व्यक्ती गंभीर जखमी झाले तर १,२८८ घरांची पडझड झाली. २० जनावरे पुरात वाहून गेलीत. ८ वीज पडून ठार तर ३ जनावरांचा गोठ्याची भिंत पडून मृत्यू झाला आहे.
नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाल्याकाठालगतची ३,७२७ हेक्टर जमीन खरडून गेली. शेतात पाणी साचल्याने ८ हजार हेक्टरमधील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावर्षी १ जून ते ५ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ४६५ मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ७०३.३ मि.मी. पाऊस पडला. याची १५१.३ एवढी टक्केवारी आहे. सर्व तालुक्यांनी सद्यस्थितीत पावसाची सरासरी पार केली आहे. यंदा ३२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली असल्याने नुकसानीचा आकडा वाढला आहे.
यंदा सुरूवातीच्या काळात पाऊस बेपत्ता होता. नंतरच्या काळात मात्र, पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला. परिणामी पूरामुळे अनेकांचे बळी गेले. तसेच अनेकांची वित्तीय हानी देखील झाली. परंतु शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
वार्षिक सरासरीच्या ८६.४ टक्के पाऊस
जिल्ह्यात वार्षिक ८१४.५ मि. मी. सरासरीच्या तुलनेत दोन महिन्यात आतापर्यंत ७०३.३ मि. मी. पाऊस पडला. यामध्ये मोर्शी १०८.९ टक्के, अचलपूर १०८ टक्के, दर्यापूर १०९ टक्के, अंजनगाव १०१.३ टक्के या तालुक्यात वार्षिक सरासरीईतका पाऊस पडला आहे.