यवतमाळला सर्वेक्षणाचे आदेश, अमरावतीला ठेंगा
By Admin | Updated: September 14, 2016 00:10 IST2016-09-14T00:10:23+5:302016-09-14T00:10:23+5:30
३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्यातील ५ लाख एकरांतील सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

यवतमाळला सर्वेक्षणाचे आदेश, अमरावतीला ठेंगा
उफराटा न्याय : ५ लक्ष एकरांतील सोयाबीन उद्ध्वस्त
अमरावती : ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्यातील ५ लाख एकरांतील सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशीच स्थिती यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तेथे पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सोयाबीनच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यातील सोयाबीनची तीच गत असताना जिल्हा प्रशासनाद्वारा कुठलीही हालचाल नसल्याने सोयाबीन उत्पादक कमालीचे संतप्त झाले आहेत.
पेरणीनंतर सुरूवातीच्या काळात जिल्ह्यात समाधानकारक व पोषक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन बहरावर आले. नंतरच्या काळात सोयाबीनला पावसाची आवश्यकता असते. मात्र, ७ आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे पीक करपू लागले आहे. शेंगांमधील दाणा बारीक होऊन शेंगा पोचट होऊ लागल्या आहेत. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन करपू लागले आहे. दोन वर्षांपासून पावसाअभावी सोयाबीनची जी गत झाली तिच गत यंदाच्या खरीप हंगामात होत आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ८९ हजार २१२ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली. यामध्ये जून महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तेथील व उच्चप्रतीच्या जमिनीतील सोयाबीनची स्थिती बरी आहे.
सोयाबीनची स्थिती वाईट
अमरावती : मात्र, हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीनची स्थिती मात्र वाईट आहे. जिल्ह्यात यंदा अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ हजार ४२० हेक्टर, अचलपूर १४ हजार ३०, चांदूरबाजार १६ हजार २००, धामणगाव १८ हजार २३, चांदूररेल्वे २७ हजार ३३५, तिवसा २२ हजार ९१४, मोर्शी १९ हजार ५७७, वरुड २ हजार ८०, दर्यापूर १४ हजार २४३, धारणी ९ हजार ९३०, चिखलदरा ११ हजार ५४३, अमरावती ३८ हजार ९६०, भातकुली २२ हजार ६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५० हजार २७८ हेक्टर इतके सोयाबीन क्षेत्र आहे. मात्र, पावसाअभावी यंदा देखील सोयाबीन हातचे जाणार, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
सलग तिसऱ्या वर्षी घात
दोन वर्षांपासून पावसाअभावी सोयाबीन करपत आहे. शेंगा भरत नाहीत. यामुळे सरासरी उत्पन्नात ५० ते ७० टक्के घट आली. यंदा देखील ३५ दिवसांपासून पावसाचा खंड असल्यामुळे सोयाबीनची तिच गत झाली आहे. सोयाबीन करपले आहे. मध्यम व हलक्या प्रतीच्या जमिनीतील सोयाबीन आताच उद्धवस्त झाले आहे. या दोन दिवसांत पाऊस न पडल्यास संरक्षित सिंचनाचे क्षेत्र वगळता सर्वत्र हीच स्थिती राहणार आहे.
मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन पावसाअभावी करपले, ही वस्तुस्थिती आहे.मात्र, सर्वेक्षणाचे आदेश नाहीत. यासंदर्भात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी