महिलांची ‘वीरुगिरी’
By Admin | Updated: December 18, 2014 22:46 IST2014-12-18T22:46:59+5:302014-12-18T22:46:59+5:30
वडाळीतील तुर्तास बंद असलेले दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी गुरुवारी आठ महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. यामुळे प्रशासनही हादरले. पश्चात निवासी

महिलांची ‘वीरुगिरी’
अमरावती : वडाळीतील तुर्तास बंद असलेले दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी गुरुवारी आठ महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली. यामुळे प्रशासनही हादरले. पश्चात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी शिष्टमंडळाने चर्चादेखील केली. मात्र लेखीपत्राशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली. मात्र दुकान हटविण्याची लेखी हमी न मिळाल्याने आंदोलक महिला आल्या पावली परतल्या. परिणामी सायंकाळी उशिरापर्यंत महिलांची वीरुगिरी सुरुच होती, हे विशेष.
महिला आक्रमक, पोलिसांची भंबेरी
स्थानिक वडाळी परिसरातील वनपरिक्षेत्र कार्यालयासमोरील भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीवर गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आठ महिला चढल्या. वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करा, न्याय द्या, न्याय द्या, मतदान नकोच, प्रशासनाने दिशाभूल थांबवावी अशा घोषणा या महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून देण्यास प्रारंभ केला. अचानक पाण्याच्या टाकीवर महिलांनी दारुबंदीसाठी आंदोलन सुरु केल्याने पोलीस प्रशासनाची भंबेरी उडाली. काही वेळाने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचला. आंदोलन करणाऱ्या महिलांची समजूत घालण्याचा पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या टाकीवर कोणी पोलीस अधिकारी किंवा महिला शिपाई आल्यास दगड मारु, डोकी फोडू अशी धमकी आंदोलक महिलांनी दिली. सहायक पोलीस आयुक्त जी.एम. साखरकर, फेजपुऱ्याचे ठाणेदार डी. सी. खंडेराव, विशेष शाखा निरिक्षक अहिरे आदी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी हजर होता. दरम्यान जिल्हाप्रशासनाच्या सुचनेनुसार या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळाला उपनिवासी जिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांच्याक डे चर्चेसाठी बोलावण्यात आले. त्यानुसार काही जण पवार यांच्याकडे गेलेत. प्रशासन महिलांच्या बाजुने असल्याचे आश्वासन तेजूसिंग पवार यांनी शिष्टमंडला दिले. परंतु प्रशासनाने लेखी स्वरुपात पत्र द्यावे, ही मागणी शिष्टमंडळाने कायम ठेवली. मात्र आदेश आल्याशिवाय लेखी पत्र देता येणार नाही, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.