महिलांवर दारुविक्रेत्यांचा हल्ला
By Admin | Updated: December 10, 2014 22:48 IST2014-12-10T22:48:47+5:302014-12-10T22:48:47+5:30
गावात अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्री करणाऱ्या एका कुटुंबातील सदस्यांना दारुबंदी महिला मंडळातील सदस्यांनी हटकल्याने दारुविक्रेत्यांनी याच महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांवर काठीने हल्ला केला.

महिलांवर दारुविक्रेत्यांचा हल्ला
भातकुली रेणुकापूर येथील घटना : दोन जण गंभीर, गावात तणावपूर्ण शांतता
धामणगाव रेल्वे : गावात अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्री करणाऱ्या एका कुटुंबातील सदस्यांना दारुबंदी महिला मंडळातील सदस्यांनी हटकल्याने दारुविक्रेत्यांनी याच महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांवर काठीने हल्ला केला. यात दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री धामणगाव रेल्वे तालुक्यातील भातकुली रेणुकापूर येथे घडली. गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी अवैध दारुविक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, धामणगाव रेल्वे तालुक्यातील भातकुली रेणुकापूर हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव असून गेल्या अनेक वर्षांपासून गावात दारुविक्री सुरू होती. काही महिलांनी पुढाकार घेऊन गावात दारुबंदी मंडळाची स्थापना केली. गावातून दारु हद्दपार व्हावी म्हणून महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनाही निवेदन दिले. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गावातीलच एक इसम दारु विकत असल्याचे दारुबंदी महिला मंडळातील रिया रवींद्र सोनवणे यांच्यासह काही महिलांनी त्या दारुविक्रेत्याला हटकले. याचवेळी अवैध दारुविक्री करणाऱ्या ५ जणांनी महिलांवर काठीने तसेच दगडांनी हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. जखमींमध्ये गंगाबाई लसवंते, प्रदीप फुसे यांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी गावात अवैधरित्या दारुविक्री करणाऱ्या मदन जयस्वाल, दीपक जयस्वाल, मनोज जयस्वाल, नवीन जयस्वाल या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण धोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा अधिक तपास ए. आर. पुरी करीत आहे. या घटनेमुळे गावात बुधवारी तणावपूर्ण शांतता होती. गावातील शाळा व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. (तालुका प्रतिनिधी)