शहाण्यांनी चढावी पोलीस, कोर्टाची पायरी
By Admin | Updated: September 15, 2015 00:09 IST2015-09-15T00:09:31+5:302015-09-15T00:09:31+5:30
‘शहाण्या व्यक्तीने कोर्टाची पायरी चढू नये’, या सर्वव्याप्त मान्यतेला अमरावतीचे जिल्हा न्यायाधीश (प्रथम) एस.एस.दास यांनी खुले आव्हान दिले.

शहाण्यांनी चढावी पोलीस, कोर्टाची पायरी
एस.एस. दास यांचे प्रतिपादन : पार्डी गावात न्यायाधीशांची मांदियाळी
अंजनगाव बारी : ‘शहाण्या व्यक्तीने कोर्टाची पायरी चढू नये’, या सर्वव्याप्त मान्यतेला अमरावतीचे जिल्हा न्यायाधीश (प्रथम) एस.एस.दास यांनी खुले आव्हान दिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकारण आणि स्वराज्य मित्र सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती तालुक्यातील पार्डी (देवी) येथे शनिवारी आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.
शहाण्या माणसाने कधीही अन्याय सहन करू नये; आपल्यासमोर किंवा शेजारची कोणी स्त्री मार खात असेल तर शहाण्या माणसाने कधीही गप्प बसू नये; त्याविरोधात पोलीस स्टेशन आणि कोर्टात नक्कीच जायला हवे; आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला साथ देणे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे सुस्पष्ट प्रतिपादन न्यायाधीश दास यांनी केले. जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मालमत्ता व वारसा अधिकारातील स्त्रियांसाठी असलेल्या तरतुदी एका सोप्या गोष्टीतून जिल्हा न्यायाधीश (तृतीय) श्रीमती एस.एस. भीष्म यांनी गावकऱ्यांना समजावून दिले.
आजकाल लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १८ वर्षांखालील मुलांवरील लैंगिक अत्याचारास प्रतिबंध घालणारा व त्यासाठी गुन्हेगारास कठोर दंडाची तरतूद करणारा पोस्को (पीओसीएसओ) कायद्याची प्राथमिक ओळख त्यांनी करून दिली. कौटुंबिक वाद, पोटगी, बालन्याय कायदा यासंदर्भात सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) जे.पी. शिराळे यांनी माहिती शिबिरातील उपस्थित नागरिकांना दिली.
पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या मुलगी वाचवा, मुलगी शिकवा अभियानाची विस्तृत माहिती देत गटविकास अधिकारी प्रमोद कापडे व सहायक गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी स्त्री भ्रूणहत्या थांबविण्याचे आवाहन केले.
बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत ४४ गावांपैकी पार्डी (देवी) गाव खरोखरच तंटामुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे गाव पुरस्कारास पात्र असल्याबद्दल पोलीस अधिकारी डी.एस. कडू यांनी येथे समाधान व्यक्त केले.
संचालन सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस.एन. माने-गाडेकर यांनी केले. दिवाणी न्यायाधीश एस.एस. ओझा यांनी प्रास्ताविक केले. स्वराज्यमित्र सामाजिक संस्थेचे सचिव राहुल बैस यांनी आभार प्रदर्शन केले.
पार्डी (देवी) गावच्या सरपंच रेखा कडव, माजी सरपंच रेखा सरदार, उपसरपंच नगराळे, ग्रामपंचायत सदस्य, स्वराज्य मित्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता श्रृती मेहता, न्यू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता भेंडे व सचिव, मुख्याध्यापक पी.झेड. बांडाबुचे, शिरीष जाखड उपस्थित होते. (वार्ताहर)