येलकीचा क्षतिग्रस्त बंधारा के व्हा काढणार ?
By Admin | Updated: August 30, 2016 00:03 IST2016-08-30T00:03:34+5:302016-08-30T00:03:34+5:30
अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा येथील पूर्णा नदीवर असलेला 'पूल वजा बंधारा' २०१४ मधील पुराने क्षतिग्रस्त झाला आहे.

येलकीचा क्षतिग्रस्त बंधारा के व्हा काढणार ?
पूर्णेच्या पुरामुळे गावाला धोका : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे दुर्लक्ष
अमरावती : अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा येथील पूर्णा नदीवर असलेला 'पूल वजा बंधारा' २०१४ मधील पुराने क्षतिग्रस्त झाला आहे. मात्र या बंधाऱ्याची दुरुस्ती अद्याप नाही व नदीपात्रातील पुलाचे अवशेष देखील जि.प. लघु सिंचन विभागाने काढले नसल्याने काठा लगतचे शिव मंदिर व गावाला सतत पुराचा धोका निर्माण झाला आहे.
येलकी पूर्णा येथील शंकर प्रतिष्ठानद्वारा लघु सिंचन जलसंधारण मंडळाचे अधीक्षक अभियंता जिल्हाधिकारी अमरावती व जलसंधान विभागाचे राज्यमंत्री तसेच पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. येलकी येथे लघु सचिंन, जलसंधारण विभागाने २००० मध्ये पूर्णा नदीवर 'पूल वजा बंधारा' बांधला मात्र हा बंधारा २०१४ मध्ये पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे क्षतिग्रस्त झाला व अवशेष तेथेच पडले आहेत.
हा बंधारा १०० हेक्टर सिंचन क्षमतेचा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्यो कार्यक्षेत्रात येतो. हा बंधारा ३० जून ते १ आॅगस्ट २००७ या दिवशी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे क्षतिग्रस्त झाला व या बंधाऱ्यावर खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले. या बंधाऱ्याच्या गाळामध्ये मोठमोठी झाडे व कचरा अडकल्याने गाळ्यांमधून पाण्याची वहन क्षमता कमी झाली व उजव्या बाजूकडून पाण्याचा प्रवाह अधिक वळता झाल्याने नदीपात्रातील बंधाऱ्याचे प्रस्तंभ खाली दबून कोसळले व हा बंधारा निकामी झाला. या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे अव्यवहार्य असल्याने नदीपात्रातील उर्वरित भाग अजून तसाच आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहाला अडसर व पुराच्या वेळी फुगवटा निर्माण होतो. यामुळे नदीपात्रात मोठा खड्डा पडला आहे. येथील शिव मंदिरास व गावास पुराचा कायम धोका आहे. त्यामुळे नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्याचे अवशेष, कमाणी व स्लॅब काढून टाकणे महत्वाचे आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
येलकी पूर्णा परिसर हा खारपान पट्टा आहे. त्यामुळे नदीकाठची जमीन भुसभुशीत आहे व चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधण्यात आल्यामुळेच हा बंधारा क्षतिग्रस्त झाला. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली व मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी २७ जुलै २०१५ रोजी चौकसी व कारवाईसाठी लघु सिंचन व जलसंधारण मंडळाला पत्र दिले. मात्र यावर अद्याप कार्यवाही नाही.
मेकॅनिकल युनिटच्या उपअभियत्यांना चौकशी करण्याचे पत्र दिले आहे व अचलपूर उपविभागाला मलबा हटविण्यासाठी अंदाजपत्रक मागविले आहेत.
- प्रमोद तलवारे,
कार्यकारी अभियंता
पाटबंधारे विभाग, जि.प.
बंधाऱ्याची दुरुस्तीही नाही व नदीपात्रातील अवशेषदेखील काढण्यात आलेले नाही. त्यामुळे येलकी शिवमंदिरास धोका व गावात पुराचे पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
- कैलास राऊत, अध्यक्ष, शिवसंस्थान प्रतिष्ठान