अतिरिक्त तुकड्या सुरू होणार ?
By Admin | Updated: July 21, 2015 00:23 IST2015-07-21T00:23:34+5:302015-07-21T00:23:34+5:30
राज्यातील एकही विद्यार्थी प्रथम वर्ष स्रातक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही,

अतिरिक्त तुकड्या सुरू होणार ?
प्रवेशाचा गोंधळ : मोर्शी-वरूड तालुका वंचित
मोर्शी : राज्यातील एकही विद्यार्थी प्रथम वर्ष स्रातक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी कुलगुरुंना दिले. त्यामुळे मोर्शी - वरूड तालुक्यातील प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असला तरी महाविद्यालये कायम विनाअनुदान तत्त्वावर अतिरिक्त तुकड्या सुरु करतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोर्शी उपविभागातील महाविद्यालयांनी त्यांच्या प्रवेशसंख्येएवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असला तरी उपविभागातील वरूड आणि मोर्शी तालुक्यातील शेकडो विद्यार्थी प्रथम वर्ष स्रातक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहिले.
दुसरीकडे २९ एप्रिल २०१५ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सत्र २०१५-१६ करिता नवीन महाविद्यालये, अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांना अतिरिक्त तुकड्या, अभ्यासक्रम, विषय न देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करुन याप्रकरणी वाचा फोडली होती.
दरम्यान आ. अनिल बोंडे यांनी थेट मंत्रालय गाठून मोर्शी उपविभागातील दोन्ही तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडून याप्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरुन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १३ जुलै रोजी राज्यातील सर्व कुलगुरुंना पत्र पाठवून विद्यापीठ अधिनियमाच्या तरतुदीअंतर्गत विद्यापीठांना प्राप्त अधिकारानुसार राज्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे; तथापि अतिरिक्त तुकड्या देण्याची कार्यवाहीदेखील फक्त सत्र २०१५-१६ पूरतीच मर्यादित राहणार असून या अतिरिक्त तुकड्यांचा कोणताही आर्थिक भार शासन उचलणार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तुकड्यांचा प्रश्न अधांतरीच आहे. (तालुका प्रतिनिधी)
महाविद्यालये आर्थिक भार उचलतील का ?
शासनाच्या या पत्राच्या आधारे मोर्शी आणि वरूड तालुक्यातील महाविद्यालयांनी अतिरिक्त तुकड्यांची मागणी केली आणि विद्यापीठाने ती दिली तर विद्यार्र्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न सुटणार जरी असला तरी या विद्यार्थ्यांकरिता लागणाऱ्या शिक्षकांच्या वेतनासह इतर आर्थिक भार स्वत:वर ओढवून घेऊन अतिरिक्त तुकड्या सुरु करतील का, हा खरा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.