यशोमतींविरुद्ध कोण? विरोधकांचे मंथन
By Admin | Updated: June 10, 2014 23:46 IST2014-06-10T23:46:41+5:302014-06-10T23:46:41+5:30
शिवसेना आणि भाजपच्या मगरमिठीत असलेला तिवसा मतदारसंघ यशोमती ठाकूर यांनी २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे खेचून आणला. १५ वर्षे सेना-भाजपचेच राज्य असल्यामुळे विकासकामे करून नेतृत्त्व

यशोमतींविरुद्ध कोण? विरोधकांचे मंथन
गणेश देशमुख - अमरावती
अमरावती - शिवसेना आणि भाजपच्या मगरमिठीत असलेला तिवसा मतदारसंघ यशोमती ठाकूर यांनी २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडे खेचून आणला. १५ वर्षे सेना-भाजपचेच राज्य असल्यामुळे विकासकामे करून नेतृत्त्व सिद्ध करणे हा एकमेव पर्याय यशोमती ठाकूर यांच्या पुढ्यात होता. त्यांनी विकास कामांचा धडका लावला. भाजप-सेनेच्या 'अच्छे दिन'मुळे नवी उमेद जागलेल्या जुन्या-नव्या इच्छुकांसमोर तार्इंची ही छबी कशी भेदायची हा प्रश्न उभा ठाकला आहे.
जुन्या वलगाव मतदारसंघात शिवसेनेचे संजय बंड १५ वर्षे आणि तिवसा मतदारसंघात भाजपचे साहेबराव तट्टे १० वर्षे आमदार होते. २००९ साली या दोन्ही मतदारसंघांचे विलिनीकरण झाले. नव्या तिवसा मतदारसंघात २००९ साली यशोमती ठाकूर काँग्रेसच्या तिकिटावर २६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्यात. जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार असलेल्या यशोमती ठाकूर तिवसा मतदारसंघातील पहिल्या आणि काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आलेल्या विदर्भातील एकमेव महिला आमदार आहेत.
यशोमती यांची मजबूत पकड असलेल्या तिवसा मतदारसंघातून भाजपकडून साहेबराव तट्टे, निवेदिता चौधरी-दिघडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सेनेच्या दिनेश नाना वानखेडे आणि राजेश वानखेडे यांनीही इच्छा प्रदर्शित केली आहे. राजेश वानखेडे हे कंत्राटदार लॉबीतील आहेत. मनसेचे आकाश वऱ्हाडे यांची तयारी जोरात आहे. शासकीय अभियंतापदावरून निवृत्त झालेले रमेश मातकर आमदारकीसाठी उत्सुक आहेत. जातीच्या समिकरणावर त्यांची भिस्त आहे. पक्ष अद्याप ठरलेला नाही. बच्चू कडू यांच्या प्रहारतर्फे संजय देशमुख आणि पवन ऊर्फ छोटू महाराज वसु बाशिंगे बांधून तयार आहेत. देशमुखांच्या कार्यपद्धतीवर जशी पक्षात तशीच पक्षाबाहेरही असलेली नाराजी अडचणीचा मुद्दा आहे.
तिवसा मतदासंघाचे वैशिष्ट्य असे की, मोझरीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वलगाव निर्वाणभूमी असलेले वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज, कौंडण्यपूरच्या आदिशक्ती रुक्मिणी यांची धार्मिक स्थळे याच मतदारसंघात आहेत.
यशोमतींच्या तोडीचा उमेदवार कोण, या विषयावरच अद्याप विरोधी पक्षांत मंथन सुरू आहे. यशोमतींनी उभे केलेले आव्हान भेदण्यासाठी भाजप-सेनेचे 'ब्रेन्स' काय पर्याय शोधतात याकडे जसे अमरावती जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचेही लक्ष केंद्रीत आहे.