शाळेत जाताना बेपत्ता झालेले विद्यार्थी मुंबईत गवसले
By Admin | Updated: July 24, 2015 00:16 IST2015-07-24T00:16:36+5:302015-07-24T00:16:36+5:30
शाळेत जाण्याकरिता घरातून निघालेले तीन विद्यार्थी बुधवारी अचानक बेपत्ता झाले. या तिन्ही विद्यार्थ्यांना गुरूवारी पहाटे मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.

शाळेत जाताना बेपत्ता झालेले विद्यार्थी मुंबईत गवसले
बुधवारची घटना : ‘हाजी अली’तून आलेल्या ‘कॉल’मुळे लागला पत्ता
अमरावती : शाळेत जाण्याकरिता घरातून निघालेले तीन विद्यार्थी बुधवारी अचानक बेपत्ता झाले. या तिन्ही विद्यार्थ्यांना गुरूवारी पहाटे मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. आता मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार गाडगेनगर व नागपुरी गेट पोलिसांचे पथक या मुलांना परत आणण्याकरिता मुंबईला रवाना झाले असून या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार, नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नूरनगर, मेमन कॉलनी निवासी गुलाम हुसैन ऊर्फ लालू (११), हबीबनगर येथील सैयद अबुजर सैयद सलीम (११) हे दोन विद्यार्थी पॅरेडाईज कॉलनीतील युनिक इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकतात. गुलाम हुसैन याच्या शेजारी राहणारा मो. उमद मो. अमीन बकाली (१२) नामक विद्यार्थीदेखील यास्मिनगरातील नवाब उर्दू शाळेत इयत्ता सातवीत शिकतो. सैयद अबुजर नेहमीच आॅटोेरिक्षाने शाळेत येतो तर गुलाम हुसैन हा सायकलने शाळेत जातो. परंतु बुधवारी सैयद अबुजर नेहमीप्रमाणे आॅटोरिक्षाने शाळेत पोहोचला. मात्र, तो बाहेरच थांबला तर गुलाम हुसैन हादेखील या दिवशी शाळेकडे सायकल न घेताच निघाला. त्यानंतर हे तीनही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी परतलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी सायंकाळनंतर त्यांचा शोध सुरू केला. या तीन विद्यार्थ्यांचे घर तसेच शाळा नागपुरी गेट तसेच गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तीनही विद्यार्थ्यांच्या पालकांनी दोन्ही पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी लगेच तपासाची सूत्रे हलविली. मुलांचे अपहरण तर झाले नाही ना? अशी शंका होती. मात्र, मुंबई येथे मुले सुखरूप असल्याची माहिती मिळाली.