बेलोरा विमानतळावरून उड्डाण केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:07+5:302021-02-05T05:28:07+5:30
( शामकांत सहस्त्र भोजने) बडनेरा: बेलोरा विमानतळाहून भरारी घेण्याची उत्सुकता जिल्ह्यासह विभागाला लागली आहे; मात्र संथगतीने सुरू ...

बेलोरा विमानतळावरून उड्डाण केव्हा?
( शामकांत सहस्त्र भोजने)
बडनेरा: बेलोरा विमानतळाहून भरारी घेण्याची उत्सुकता जिल्ह्यासह विभागाला लागली आहे; मात्र संथगतीने सुरू असणाऱ्या कामकाजामुळे मुहूर्तमेढ केव्हा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कामाला गती देण्यासाठी नुकतेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या कामकाजासंदर्भात भेट दिली असून, त्याचे फलित समोर आले पाहिजे, अशी भावना नागरिकांची आहे.
गेल्या दहा वर्षांपासून बेलोरा विमानतळ उभारणीचे काम सुरू आहे. या विमानतळामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे. प्राप्त माहितीनुसार बेलोरा विमानतळ या ठिकाणच्या कामकाजातील संरक्षण भिंत उभारण्याचे काम अर्धवट आहे. त्याचप्रमाणे टर्मिनस बिल्डिंगची कामेही अर्धवट असून, धावपट्टीची कामे केव्हा पूर्ण होतील, याबाबत कोणीही ठामपणे सांगत नाही. मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. परंतु, विमानतळाच्या विस्तारीकरणाची कामे अपूर्णच आहेत. नुकतेच एमएडीसीचे मुंबई येथील अधिकारी बेलोरा विमानतळ याठिकाणी कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी याठिकाणी सुरू असणाऱ्या कामांची माहिती जाणून घेतल्याची माहिती आहे. हे अधिकारी बेलोरा विमानतळ या ठिकाणी उशिरा पोहोचले होते, काही शेतकरी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी बराच वेळपर्यंत ताटकळत बसले होते. काही कामांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. निधी उपलब्ध झाल्यास कामाला गती मिळू शकते. बेलोरा विमानतळ लवकरात लवकर पूर्णत्वास जावे व येथून भरारी घेता यावी, अशा प्रतीक्षेत नागरिक आहेत. सक्षम व कामाला गती देणारा अधिकारी याठिकाणी तळ ठोकून असणे तेवढेच गरजेचे आहे. अमरावती जिल्ह्यातून मुंबई, पुण्याकडे रेल्वेने मोठा प्रवासी वर्ग जात असतो. रेल्वेचे वातानुकूलित आरक्षित महागडे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तेव्हा अनेक वर्षांपासून रेंगाळत असणाऱ्या बेलोरा विमानतळाला गती द्यावी. शासनाने देखील याची दखल घ्यावी. काही विमानतळे कमी कालावधीत पूर्ण होऊन उड्डाणे घेत आहेत. अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाहून देखील विमानांची भरारी कशी सुरू करता येईल याचे सूक्ष्म नियोजन करावे. उद्योजकांना देखील विमान प्रवास करणे येथून सोयीचे ठरणार आहे. यापूर्वी वर्षभरात बेलोरा विमानतळावरून विमाने सुरु होतील, असे जाहीर करण्यात आले; मात्र ही घोषणा राजकीय जुमलेबाजी ठरली आहे. जिल्ह्यातील विमानतळाहून विमानात बसण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येत विमानाने प्रवास नागपूर येथून करावा लागत आहे.
----------------------
बेलोरा विमानतळासाठी कायमस्वरूपी अधिकारी नेमा
बेलोरा विमानतळाची विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी अधिकारी नेमावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जबाबदार अधिकारी नसल्याने विकासकामांचा दर्जा खालावत असल्याची माहिती आहे. नियंत्रण अधिकारी नसल्यामुळे संरक्षण भिंतीचे काम नित्कृष्ट दर्जाचे करण्यात आले, असा आक्षेप परिसरातील ग्रामस्थांचा आहे.