सुकलेल्या पिकांचे सर्वेक्षण केव्हा ?
By Admin | Updated: September 12, 2016 00:20 IST2016-09-12T00:20:28+5:302016-09-12T00:20:28+5:30
तालुक्यातील सोयाबीन पीक संपूर्ण एक महिन्याच्या पावसाच्या दडीमुळे नष्ट झाले आहे.

सुकलेल्या पिकांचे सर्वेक्षण केव्हा ?
शेतकऱ्यांना जबर फटका : पावसाच्या दडीमुळे परिणाम
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
तालुक्यातील सोयाबीन पीक संपूर्ण एक महिन्याच्या पावसाच्या दडीमुळे नष्ट झाले आहे. त्याबाबत शासकीय योजनेची शेतकरी कार्यालयात प्रतीक्षा लागली आहे.
चांदूररेल्वे तालुक्यात सोयाबीन पिकाची २७,३३४ हे. मूग ३३२ हे. उडीद १९६ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली होती. जुलै महिन्यातील अतिपावसाने खरिपातील खोयाबीन, मूग, उडीद पिके बहरली. परंतु ऐन सोयाबीनला बार येताच पावसाने तब्बल महिनाभरापासून दडी मारल्याने सोयाबीनला आलेल्या रोगासह सोयाबीनचे झाड सुकू लागले आहे. त्यामुळे या महिन्यात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांच्या पदरी याहीवर्षी निराशाच येण्याची शक्यता वाढीस लागली आहे.
महसूल यंत्रणेकडून याबाबतचे सर्वेक्षण अद्यापही सुरू न झाल्याने शेतकरी वर्गात आश्चर्य व्यक्त आहे. सोयबीनच्या २७३३४ हेक्टरमध्ये पेरणी असली तरी १८ टक्के शेतकरी ज्याचेकडे सिंचन व्यवस्था आहे ते ओलिताखाली आणले गेले. परंतु मागील वर्षी ओलिताचे सोयाबीनच्या शेंगा फुसक्या राहिल्या होत्या. २२,४१४ हेक्टरमध्ये सध्या कोरडवाहू सोयाबीन पिकाची पेरणी अस्तित्वात आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीक धोक्यात आले आहेत.
या सुकलेल्या खरीप पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी महसूल यंत्रणा थोडीही हालली नसल्याने शेतकरी वर्गाची तीव्र नाराजी शासनाविरुद्ध व्यक्त केली जात आहे.
विभागीय, जिल्हास्तरावर शासकीय सभा घेऊन दररोज आढावा सभेचे इतिवृत्त प्रसिद्ध होतात. परंतु चांदूररेल्वे संपूर्ण तालुका दुष्काळाच्या छायेत असताना याबाबत साधी सभा घेऊन आढावासुद्धा घेण्यात आला नाही. याबाबत शेतकऱ्यांविषयी शासन किती उदासीन आहे, याची प्रचिती आता शेतकऱ्यांना येऊ लागली आहे.
शासनाने याबाबत एका आठवड्याच्या आत निर्णय न घेतल्यास शेतकरी वर्ग रस्त्यावर येऊन शासकीय यंत्रणेला जाब विचारण्याच्या तयारीत असल्याचीही तालुक्यात चर्चा होत आहे. या सुकलेल्या सोयाबीन पिकाच्या सर्वेक्षणाची शेतकऱ्यांनी कुठपर्यंत प्रतीक्षा करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.