दोन लाख शेतकऱ्यांना १०९ कोटींची मदत केव्हा ?

By Admin | Updated: September 7, 2016 00:13 IST2016-09-07T00:13:34+5:302016-09-07T00:13:34+5:30

गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर केला.

When do we help 109 lakhs of two lakh farmers? | दोन लाख शेतकऱ्यांना १०९ कोटींची मदत केव्हा ?

दोन लाख शेतकऱ्यांना १०९ कोटींची मदत केव्हा ?

 सोयाबीन, कापूस उत्पादक वाऱ्यावर : पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत नाही
गजानन मोहोड अमरावती
गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर केला. या अनुसार ५० टक्के प्रमाणात विशेष मदत देण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील निकषपात्र १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रूपयांची मदत अपेक्षित असताना शासनाने यंदाचा खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना एक छदामही दिलेला नाही.
गतवर्षी जिल्ह्यातील पैसेवारी ५० पैशाच्या आत म्हणजे ४३ पैसे असल्याने व याविषयी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारल्याने शासनाने जिल्ह्यासह विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, केंद्राच्या एनडीआरएफच्या नवीन निकषाप्रमाणे अद्याप मदत दिलेली नाही.

सोयाबीन उत्पादक संतप्त
अमरावती : मात्र सोयाबीन व कपाशी पिकासाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीकविमा योजनेची मंडळनिहाय जाहीर रकमेच्या ५० टक्के प्रमाणात मदत करण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतला. यासाठी तालुकानिहाय शेतकऱ्यांची माहिती शासनाने २२ एप्रिल रोजी मागविली व याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ एप्रिल रोजी सर्व तहसीलदारांना सूचना देऊन निकषप्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या. मात्र, विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आॅगस्ट महिन्यात तयार झाल्या.
या अन्वये जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ८६१ शेतकऱ्यांनी २ लाख ३८ हजार ५१९ हजार हेक्टर सोयाबीन पिकासाठी व १९७ गावांतील १७११ शेतकऱ्यांनी ५९९७ शेतकऱ्यांनी कपाशी पिकासाठी विमा काढलेला नाही. या सर्व शेतकऱ्यांना विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात म्हणजे १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये शासनाकडे केली असताना दुष्काळाचे अनुदान अद्याप देण्यात आलेले नाही. यामुळे शेतकरी कमालीचे संतप्त झाले आहे.

कपाशीसाठी ३९ लाखांची मागणी
दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात कपाशीसाठी पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्यात येणार आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील १ हजार ७११ शेतकऱ्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यातील १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपयांची अशी एकूण १ हजार ८४८ शेतकऱ्यांना ३९ लाख ४४ हजार १८१ रुपयांची मदत अद्याप देण्यात आलेली नाही.

असा आहे विशेष मदतीचा शासनादेश
अमरावती, नागपूर, औरंगाबाद व नाशिक विभागातील कापूस पीक तसेच अमरावती, नागपूर विभागातील सोयाबीन पिकांसाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात रक्कम शासन देणार आहे.

Web Title: When do we help 109 lakhs of two lakh farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.