शहर बसेसची चाके थांबली; चालक-वाहकांचे कामबंद आंदोलन
By Admin | Updated: December 20, 2014 00:09 IST2014-12-20T00:09:23+5:302014-12-20T00:09:23+5:30
बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी शहर बसच्या एका चालकाला नाहक मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही.

शहर बसेसची चाके थांबली; चालक-वाहकांचे कामबंद आंदोलन
अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी शहर बसच्या एका चालकाला नाहक मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही. याच्या निषेधार्थ शुक्रवारी चालक- वाहकांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. तब्बल चार तास शहर बसेसची चाके थांबली. आरोपींच्या अटकेसाठी कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालय गाठून कैफियत मांडली.
शहर बस चालक- वाहकांच्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपूर्वी शेख इमरान ऊर्फ सोनू या चालकाने मोटरसायकलला ‘कट’ मारल्याच्या कारणावरुन तीन ते चार जणांनी बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात मारहाण केली. कोणतीही पार्श्वभूमी नसताना क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी चालक शेख इमरान याने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मारहाण करणाऱ्या युवकांकडे असलेल्या पल्सर मोटसायकल गाडीचा क्रमांकही दिला. मात्र तीन दिवसांनंतरही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.
याप्रकरणाची तक्रार महापालिका आयुक्त, उपायुक्तांना देण्यात आली आहे. परंतु प्रशासन स्तरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने शहर बसेसचे चालक- वाहकांनी शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारार काम बंद आंदोलन सुरु केले. परिणामी चार तासभर शहर बसेसची चाके थांबलीत. सुमारे ३३ शहर बसेस बंद झाल्यामुळे प्रवाशांना ये- जा करताना फारच त्रास सहन करावा लागला. दरम्यान महापालिका उपायुक्त विनायक औगड यांच्याशी शिवसेना कामगार नेते नितीन तारेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी चालक- वाहकांसह भेट घेतली. सतत चालक, वाहकांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे प्रवाशांना सेवा देताना मनोबल खचत चालल्याची बाब प्रशांत वानखडे यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मनपा उपायुक्त विनायक औगड यांनी बडनेऱ्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधण्यजाचा प्रयत्न केला. पण, कडू यांनी उपायुक्तांना प्रतिसाद दिला नाही. ही बाब शहर बसेसचे चालक- वाहकांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे ठाणेदार कडू यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठीचा मोर्चा पोलीस आयुक्तांच्या दिशेने वळविण्यात आला. यावेळी शेखर निर्वाण, अभि गौरकर, गजानन ढगे, अजय स्वामी, अजय डाखोरे, नरेंद्र इंगोले, रवी माहोरे, ज्ञानेश्वर लांडे, विपीन जवंजाळ, दत्ता शेवाणे, सचिन सियाले, ओेम मिश्रा, धनराज बनसोड, गजानन वाघमारे, नितीन भगत, नितीन यादव आदी उपस्थित होते.