संवादाऐवजी हिंसेचा मार्ग का ?

By Admin | Updated: September 2, 2016 23:58 IST2016-09-02T23:58:14+5:302016-09-02T23:58:14+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोघांचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाला.

The way of violence rather than dialogue? | संवादाऐवजी हिंसेचा मार्ग का ?

संवादाऐवजी हिंसेचा मार्ग का ?

चुप्पीमागील रहस्य काय ? : भक्तांकडून धमक्यांचे सत्र
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोघांचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. 'लोकमत'ने आरंभलेल्या शोधवृत्तमालिकेमुळे हे भयंकर गुन्हे उघडकीस आलेत. आश्रमाच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्यांसंबंधी आश्रमाने आजतागायत एकदाही पत्रपरिषद घेऊन लोकदरबारात भूमिका मांडली नाही. लोकशाहीत वावरत असताना शंकर महाराज यांच्या भक्तांनी संवादाऐवजी हिंसेचा मार्ग अवलंबला. असे का, हा प्रश्न आता प्रकर्षाने उपस्थित होतो आहे.
शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेशचा गळा चिरल्यावर तो अपघात असल्याचे, नंतर आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे सांगून आश्रमाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. 'लोकमत'च्या शोधमोहिमेमुळे तो हल्ला होता आणि नरबळीसाठीच करण्यात आला असल्याचे सत्य उघड झाले. प्रथमेशपूर्वी अजय वणवे या चिमुकल्याचा चेहरा नरबळीच्याच उद्देशाने दगडाने ठेचण्यात आला होता. त्यावेळीदेखील आश्रमाने अजयच्या आईला तो बाथरूममध्ये पडल्याची खोटी माहिती दिली होती. 'लोकमत'मुळे ते सत्यही उघड झाले.
आश्रमाने दोन्ही घटना लपविण्याचाच आटोकाट प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला. घटना उघडकीस आल्यात. घटना लपविण्यात मोजकेच मेंदू सहभागी असतील आणि संपूर्ण आश्रम व्यवस्थापनाचा त्याच्याशी काहीएक संबंध नसेल तर गुन्हे लक्षात येताच पत्रपरिषद घेऊन या गंभीर गुन्ह्यांबाबत आश्रमाची, व्यवस्थापनाची आणि शंकर महाराजांची भूमिका जाहीर का करण्यात आली नाही? दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी 'लोकमत'ने सुरुवातीपासूनच आश्रमाशी वारंवार संपर्क केला; मात्र प्रतिक्रियेसाठी, बाजू मांडण्यासाठी कुणीही उपलब्ध होत नव्हते. आश्रमाने प्रवक्ता नेमावा, असेही सूचविण्यात आले. वृत्तमालेतूनही त्यासाठीचे आवाहन केले. मात्र आश्रमाने रहस्यमय चुप्पी कायम ठेवली.
अन्याविरुद्ध निडरपणे लिखाण करणे, शोधकार्य करून अन्यायाच्या मुळाशी जाणे आणि वृत्ताच्या माध्यमातून लोकदरबारात सत्य उघड करणे, हे शोधपत्रकारितेचे प्रमुख अंगच आहे. निर्भिड बाण्याच्या 'लोकमत'ने हेच केले. प्रथमेश आणि अजय वाचले. अवघी माणुसकी त्यांच्या पाठिशी उभी ठाकली. दोघांच्याही मातांची कूस उजाडता-उजाडता वाचली. यापुढे आणखी कुण्या प्रथमेशच्या गळ्यावरून ब्लेड फिरू नये, कुण्या अजयचा चेहरा ठेचला जाऊ नये, हाच 'लोकमत'चा हेतू. नरबळीचे प्रकरण केवळ दोघांपुरतेच मर्यादित नसून त्याची पाळेमुळे दूरवर पसरलेली असण्याची शक्यता आहे. ती खणली जावीत, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. शंकर महाराजांच्या पवित्र आश्रमात नरबळी घडत असतील तर त्याची गुपिते उलगडण्यासाठी आश्रमाच्या ट्रस्टींनी, संस्थापक अध्यक्ष शंकर महाराजांनी आणि त्यांच्या भक्तांनी मदत का करू नये? आश्रमात घडलेला हा गंभीर गुन्हा आश्रमातीलच लोकांना माहिती नव्हता. 'लोकमत'ने तो उघड करून आश्रमाला मदतच नाही का केली? खरे तर ट्रस्टींनी, शंकर महाराजांनी यासाठी 'लोकमत'चे आभार मानायला हवे. आश्रम निर्दोष आहे, ट्रस्टींचा या प्रकरणाशी संबंध नाही, शंकर महाराज पूर्णत: अनभिज्ञ आहेत, असा जर दावा पदाधिकाऱ्यांचा आहे, तर बातम्या छापल्या जाऊ नयेत, या प्रकरणात आणखी शोधकार्य होऊ नये, यासाठी ट्रस्टींची हिंसक वर्तणूक का?
आश्रम ट्रस्ट हा कायद्याला बांधिल आहे. त्याच्या तमाम पदाधिकाऱ्यांना कायदा, नियम लागू होतो. संस्थापक अध्यक्षपद स्वत: शंकर महाराजांकडे आहे. कायद्याच्या, नियमांच्या कक्षेत त्यामुळे तेदेखील येतात, यावर ट्र्स्टींना आक्षेप का? ट्रस्टींना, अध्यक्षांना भारतीय कायदे, संविधान आणि लोकशाहीचा सन्मान करण्यास काय हरकत आहे? तुम्ही निर्दोष आहात तर त्रागा कशासाठी? का इतका वैताग? कशासाठी संताप? कुण्या आईची कूस दिवसाढवळ्या उजाडली जात असेल.

सर्वांनाच उत्तरे हवी आहेत
अमरावती : कर्तव्याचा भाग म्हणून प्रसिद्धी माध्यमे त्या अन्यायाला वाचा फोडत असेल तर आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांची दंडेली कशासाठी? संवाद करण्याऐवजी, प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी धमक्यांची भाषा का?
आश्रमाचे पदाधिकारी आतापर्यंत तीनदा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे बातम्या थांबविण्याची आक्रमक मागणी घेऊन गेलेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या दालनात माागणी सादर करण्याची त्यांची पद्धती अविवेकी, दंडेलीची आणि प्रशासकीय शिष्टाचाराचा भंग करणारी होती. संवादासाठी त्यांनी निवडलेल्या शब्दांतून, वागणुकीतून आणि मुद्दा मांडण्याच्या शैलीतून त्यांच्या ठायी असलेला भक्तीगुण जराही झळकत नव्हता. त्यांनी मांडलेले मुद्दे अतार्किक होते. बातमी लिहिणाऱ्याला बोलवा, बातम्या थांबवा, तुम्ही आजच्या आज कारवाई करा, न केल्यास अनुचित काहीही घडेल, जबाबदार तुम्हीच रहाल, अशी चक्क धमकीच शिरीष चौधरी यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या दालनात गुरुवारी देऊन टाकली. सोबतीच्या सर्वांचे त्या धमकीला समर्थन होते. मुंबईहून आलेल्या अर्चना जावळकर या महिलेने सदर प्रतिनिधीला कापून टाकण्याची भाषा वापरली. संबंधित बातमीदारावर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केल्याचेही या महिलेने सांगितले. काय अर्थ होतो याचा? कुठल्या भक्तीमार्गात हे सांगितले आहे? कुण्या संत परंपरेने अशा दंडेलीच्या वागणुकीचे समर्थन केले आहे? आश्रमाची पदे तुम्ही स्वीकारायची. भोगायचीही आणि काही अपरिमित घडले तर जबाबदारी झटकायची. गुन्हे लपवायचे. संवाद टाळायचा. कुणी गुन्हे शोधून काढले तर धमक्या द्यायच्या. कुठली ही संस्कृती? आश्रम आमचा आहे. आम्ही काहीही करू. कुणाला मारू नाही तर कापू. तुम्ही बोलणारे कोण? बोललात तर तुम्हालाही संपवू, अशीच ही भाषा ना? वृत्त लिखाणाशी काय संबंध जिल्हाधिकाऱ्यांचा? काय संबंध एसपींचा? त्यांच्यावर दबाव कसता कशासाठी? लोकशाही मानता ना? मग घ्या पत्रपरिषद. बोलवा पत्रकारांना. मांडा तुमचे मुद्दे. नाहीत ना तुम्ही दोषी? का भीता प्रश्नांची उत्तरे द्यायला? अवघा जिल्हा पेटून उठला आहे. रोज आंदोलने होताहेत. सर्वांनाच उत्तरे हवी आहेत. आश्रम कुणाची जागीर नव्हे. लोकांच्या देणग्यांतून तो साकारला आहे. शासनाच्या अनुदानातून तेथे तुम्ही शाळा, वसतिगृह चालवीत आहात. तेथे राहणारी आणि ज्यांचे गळे कापले ती मुले गरिबांची आहेत. अनुसूचित जाती-जमातीतल्या लोकांची आहेत. त्यांची विशेष काळजी घेणे, त्यांच्या केसालाही धक्का लागू न देणे ही तुमची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीच आहे. चेहरा ठेचलाच कसा? गळा कापलाच कसा? काय करीत होते व्यवस्थापन? का दाबले प्रकरण? का दिली नाही पोलिसात तक्रार? का बोललात खोटे? व्यवस्थापन कशासाठी? कशासाठी स्वीकारली जबाबदारी? उत्तरे हवी आहेत सर्वांनाच! हजार प्रश्न आहेत लोकांचे. गळेही कापले जातील, उत्तरे देणार नाहीत आणि दंडेलीही करणार. हे कसे? ही लोकशाही आहे. हुकूमशाही नव्हे. ठार मारण्याच्या, यमदूत पाठविण्याच्या, वश करण्याच्या, महाराजांच्या शक्तीने धडा शिकविण्याच्या, शार्प शुटर पाठविण्याच्या धमक्या बऱ्याच देऊन झाल्यात- याद राखा, घाबरणारे येथे कुणीच नाही!

Web Title: The way of violence rather than dialogue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.