अमरावती विभागात २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा
By Admin | Updated: May 15, 2014 02:17 IST2014-05-15T02:17:30+5:302014-05-15T02:17:30+5:30
वार्षिक सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, अवकाळी पावसाने लावलेली संततधार. यामुळे अमरावती विभागातील जलसाठय़ाची स्थिती भर उन्हाळ्यात समाधानकारक आहे

अमरावती विभागात २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा
१६ गावांचा समावेश : मागील वर्षी पाणीपुरवठय़ासाठी २0१ टॅंकरचा वापर
अमरावती : वार्षिक सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, अवकाळी पावसाने लावलेली संततधार. यामुळे अमरावती विभागातील जलसाठय़ाची स्थिती भर उन्हाळ्यात समाधानकारक आहे. मोठय़ा प्रमाणावर झालेला पाऊस त्यासोबतच प्रशासनाचे पाणीटंचाई निवारणासाठी झालेले कोटेकोर प्रयत्न यामुळे विभागात सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच महिन्यात तब्बल २0१ टँकरचा उपयोग पाणी पुरवठय़ासाठी करावा लागला. मात्र त्यातुलनेत यावर्षी पाणी टंचाईची स्थिती विभागात सुसह्य आहे.
गतवर्षी अवर्षणाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १४८ गावांमध्ये पाणीटंचाई होती. या गावांची तहान भागविण्यासाठी १९३ टँकर प्रशासनाला लावावे लागले. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात केवळ ४ गावे पाणीटंचाई सदृश आहेत. या चार गावांच्या पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाने १0 टँकर लावले आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी अमरावती जिल्ह्यातील ११ गावांना पाणीटंचाईची झळ बसली. यावर्षी अमरावती जिल्ह्यात ८ गावे पाणीटंचाईसदृश आहेत. येथे पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाकडून ८ टँकर लावण्यात आले आहेत.
२0१३ मध्ये १७९ गावे विभागात पाणीटंचाईच्या विळख्यात होती. मात्र यावर्षी फार कमी गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. गतवर्षी अकोला जिल्ह्यात ४, वाशिममध्ये ९ आणि यवतमाळ जिल्ह्यात ७ गावांना पाणीटंचाईचा फटका बसला. यावर्षी अकोला व वाशीम जिल्ह्यात एकही गाव पाणीटंचाईने ग्रस्त नाही.
भूजल पातळीत झालेल्या कमालीच्या सुधारणेचा हा परिणाम आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. याठिकाणी ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अवकाळी पाऊस, खरिपात सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, तसेच अनुभवलेला गारपिटीचा तडाखा या सर्वांचा परिपाक म्हणजे भूजल पातळीत झालेली समाधानकारक वाढ २0१४ चा उन्हाळा सुसह्य करीत आहे. (प्रतिनिधी)