चौथ्या दिवशीही पाणीपुरवठा बंदच
By Admin | Updated: May 22, 2015 00:41 IST2015-05-22T00:41:51+5:302015-05-22T00:41:51+5:30
परतवाडा शहरातील पाणीपुरवठा सोमवारपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

चौथ्या दिवशीही पाणीपुरवठा बंदच
नरेंद्र जावरे अचलपूर
परतवाडा शहरातील पाणीपुरवठा सोमवारपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनची जोडणी संबंधित अभियंत्याच्या अज्ञानाने जोडली गेली नाही. परिणामी परतवाडावासीयांना पाण्यासाठी वणवन भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.
परतवाडा अचलपूर शहराला प्रस्तावित चंद्रभागा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी कंत्राट गोंडवाणा इंजिनिअरिंग या कंपनीला देण्यात आला. परंतु सदर कंपनीकडून मागील आठ वर्षांपासून कासवगतीने कार्य सुरू आहे. सोमवारी नागरिकांना कुठीलच सूचना न देता अचानक पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सलग चौथ्या दिवशी गुरुवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा खंडित होता. उन्हाळ्यात पाणीपुरवठा नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पाईप लाईन जुळलीच नाही
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या आढावा बैठकीत परतवाडा-अचलपूर शहरातील विविध विकासात्मक कामांसोबत पाणीपुरवठा योजनेचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी कान टोचले होते. त्यांची धास्ती घेत गोंडवाना इंनिनिअर कंपनीचे काही तरी काम दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला. नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनीसुध्दा या कंपनीच्या कामावर कुठलीच हरकत न घेता रान मोकळे सोडल्याचा प्रकार घडला. चंद्रभागा धरणातून आलेल्या पाईप लाईनची जोडणी स्थानीय पोस्ट आॅफीसनजीकच्या टाकीला करावयाची होती. या टाकीत अगोदर बोअरमधून पाणीपुरवठा केला जात होता. ती जोडणी तोडून नवीन जोडणीचे एकंदर हे काम होते. चंद्रभागा धरणातून आलेली पाईप लाईन जास्त व्यासाची आहे. थेट टाकीत पाणी सोडताना त्याचा प्रवाह अधिक असल्याने जोेडणी अयशस्वी ठरली. पूर्वी संबंधित मुख्य अभियंता कंपनीचा जबाबदार अधिकारी आदींची उपस्थिती आवश्यक होती. मात्र जबाबदार अभियंता बेपत्ता होते. वारंवार जोडणी निघून जात असल्याने पाणीपुरवठा झाला नाही.