वणव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात सतर्कतेचा इशारा
By Admin | Updated: May 15, 2016 23:59 IST2016-05-15T23:59:50+5:302016-05-15T23:59:50+5:30
मागील आठवड्यात वादळी पाऊस कोसळला. दोन, चार दिवस वातावरणात गारवा जाणवला. मात्र, आता तापमान वाढले असून...

वणव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात सतर्कतेचा इशारा
तापमान वाढले : जंगल, वन्यपशुंची काळजी घेण्याचे निर्देश
अमरावती: मागील आठवड्यात वादळी पाऊस कोसळला. दोन, चार दिवस वातावरणात गारवा जाणवला. मात्र, आता तापमान वाढले असून पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याच्या स्थितीत आहे. वाढत्या तापमानाचा फटका सर्वाधिक जंगल आणि वन्यपशुंना बसणार आहे. परिणामी वणव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’ जारी करण्यात आले आहे.
मागील महिन्यात टिपेश्वर, ताडोबा, पेंच व वडाळी वनक्षेत्राच्या पोहरा जंगलात आग लागून मोठी हानी झाली होती. दोन-तीन दिवसांपासून तापमानात कमालिची वाढ झाली आहे.
तप्त उन्हामुळे जीवाची काहिली होत असून जंगलांना आगी लागण्याची भीती वनविभागाने वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर वणव्यावर सॅटेलाईटद्वारे नियंत्रण मिळविण्याची तयारी देखील करण्यात आली आहे.
वनविभागाने आधुनिकतेची कास धरली असताना जंगलात लागणाऱ्या वणन्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही आधुनिक पद्धतीचा स्वीकार केला नाही. त्यामुळे दरवर्षी जंगलात लागणाऱ्या आगींवर पारंपरिक पद्धतीने वन कर्मचारी जीव मुठीत घेऊन नियंत्रण मिळवितात. परंतु मनुष्यबळाची वानवा ही खरी समस्या वणवा नियंत्रणासाठी कारणीभूत ठरु लागली आहे.
मध्यंतरी दऱ्याखोऱ्यात लागणाऱ्या आगीत मौल्यवान वनस्पती, वन्यपशू, दुर्मीळ वनौषधी, झाडे खाक झाल्याचा घटना घडल्या आहेत. राज्यात दरवर्षी दोन लाख हेक्टरच्या जवळपास जंगल जळून खाक होत असल्याची वनविभागाच्या दप्तरी नोंद आहे. विशेषत: तेंदूचे वृक्ष हे मेळघाट, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ वनक्षेत्रात सर्वाधिक आहे. या वनक्षेत्रात वणव्यामुळे लाखो रुपयांची तेंदू पाने जळून नष्ट होतात, अशी माहिती आहे. वनविभागाकडून वणव्याबाबत जनजागृती केली जाते.
अतिरिक्त वनकर्मचारी नेमले
काही दिवसांपूर्वी पोहरा जंगलात आग लागली होती. मात्र, या आगीत वन्यपशुंची हानी झाली नसली तरी वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त वनकर्मचारी नेमण्यात आले आहेत. १५ जूनपर्यंत वणव्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला.
जंगलातील आग नियंत्रण करण्यासाठी वनविभाग सज्ज आहे. यापूर्वीच जंगलात जाळ रेषा तयार करण्यात येणार आहे. फायर वॉचमनच्या नियुक्ती देखील झाल्या आहेत. आग नियंत्रणासाठी सयंत्र खरेदीची तरतूद असून ती तोकडी आहे.
- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.