कापूस खरेदी केंद्रांसाठी नोव्हेंबरची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 15, 2015 00:26 IST2015-10-15T00:26:55+5:302015-10-15T00:26:55+5:30
पावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असताना शासनाकडून कापसाला किती दर निश्चित केले जाईल,

कापूस खरेदी केंद्रांसाठी नोव्हेंबरची प्रतीक्षा
वेचणीला सुरुवात : दिवाळीनंतर शासकीय खरेदी केंद्र उघडणार
लोकमत विशेष
जितेंद्र दखने अमरावती
पावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असताना शासनाकडून कापसाला किती दर निश्चित केले जाईल, याबाबत शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात सध्या कापुस वेचणीला सुरुवात झाली आहे. मात्र पणन व सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यासाठी शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सोयाबीननंतर कापूस उत्पादनात अमरावती जिल्हा अग्रेसर आहे. परंतु पावसामुळे पाठ फिरविल्यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापसाचा खरेदी दर किती राहिल, याबाबत शासनाने कोणतीही घोषणा केली नसली तरी सध्या केंद्राच्या हमी भावाने खासगी कापूस केंद्रावर ४१५० रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी होत आहे.
येथे होती कापुस खरेदी केंद्र
जिल्ह्यात कापुस खरेदी साठी पणन विभागाने अमरावती, अचलपूर, वरूड, तिवसा, चांदुर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, आदी ठिकाणी तर सीसीआयचे कापुस खरेदी केंद्र धामणगाव रेल्वे, चांदुररेल्वे, मोर्शी आणि रोशनखेडा या चार ठिकाणी कापुस खरेदी केंद्र सुरू केली होती.
गतवर्षी ९ हजार गाठीचे उत्पादन
पणन महासंघाव्दारा सात कापुस खरेदी केंद्रावर सुमारे ४४ हजार २८३ क्विंटलची कापूस खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी ९ हजार ३६९ कापुस गाठीचे उत्पादन पणन महामंडळाने केले आहे. यावेळी कापुसाला प्रतवारीनुसार ३९५० ते ४०५० रूपयाने भाव देण्यात आला.
उत्पादनात होणार घट
मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६६५ हेक्टरवर कापसाचे पेरणी क्षेत्र होते. हंगामाच्या समाप्तीनंतर कापूस उत्पादन पाहिजे तशी भर पडली नसल्याचे चित्र दिसून आले. यंदाच्या हंगामात १ लाख ८६ हजार ६६५ हेक्टरवर कापसाचे पेरणीक्षेत्र आहे. तसेच दुष्काळ, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
पणन व सीसीआयने आतापर्यंत जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. परंतु ते झाले नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठपुरावा करु.
-सुनील वऱ्हाडे,
सभापती, बाजार समिती
कापूस वेचणीला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांच्या घरात कापूस जमा झाला आहे. मात्र शासनाकडून पणनला कापूस खरेदीसंबंधीचे आदेश नाहीत. संचालक मंडळाची ९ नोव्हेबर रोजी बैठक होत आहे. त्यामध्ये यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
-छाया दंडाळे,
संचालक पणन महासंघ.
उत्पादनात घट होणार असल्याने कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कापसाला ४ हजार ५० रुपये हमी भाव केंद्र सरकार ने दिला होता. दरवर्षी उत्पादन खर्च वाढत असल्याने शासनाने किमान ६ हजार रुपये हमीभाव कापसाला जाहीर करावा.
-अमीत अढाऊ, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सध्या जिल्ह्यात कपाशी पिकांचे पिक चांगले आहे. परतीचा पाऊ सही पोषक झाला आहे. मात्र रस शोषण करण्याची किडीचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. सध्या जरी उत्पन्न बऱ्यापैकी होण्याची शक्यता असली, तरी वातावरणातील बदल लक्षात घेता उत्पन्नाबाबत निश्चित सांगता येणार नाही.
-दतात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.