वीरेंद्र जगताप, बच्चू कडूंची हॅट्ट्रिक
By Admin | Updated: October 19, 2014 23:15 IST2014-10-19T23:15:02+5:302014-10-19T23:15:02+5:30
यंदाची विधानसभा निवडणूक एकंदरच ऐतिहासिक ठरली. अमरावती जिल्ह्यातही अनेक विस्मयकारक घडामोडी घडल्या. ऐनवेळी बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील अपक्ष

वीरेंद्र जगताप, बच्चू कडूंची हॅट्ट्रिक
अमरावती : यंदाची विधानसभा निवडणूक एकंदरच ऐतिहासिक ठरली. अमरावती जिल्ह्यातही अनेक विस्मयकारक घडामोडी घडल्या. ऐनवेळी बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बच्चू कडू आणि धामणगाव-चांदूररेल्वे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी केलेली विजयाची हॅट्ट्रिक आश्चर्यजनकच म्हणावी लागेल.
यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी होती. महायुती-आघाडीत झालेली ताणातुणी आणि त्यानंतर सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय हे या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. युती-आघाडीची शकले पडली आणि पक्षांतराला पेव फुटले. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने दुखावलेल्या अनेकांनी पक्षांतर केले. त्यामुळे निवडणुकीचा चेहराच स्पष्ट होत नव्हता. त्यात मोदींची लाट असल्याने भाजपच्या उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. अशा स्थितीत अचलपूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या बच्चू कडू यांच्यासाठी ही निवडणूूक काही सोपी नव्हती. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या सुरेखाताई ठाकरे, काँग्रेसच्या माजी मंत्री असलेल्या आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंंगणात उतरलेल्या वसुधा देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, भाजपचे अशोक बनसोेड यांचे आव्हान बच्चू कडूंना पेलायचे होते. एकंदरीत भाजपची लाट लक्षात घेता बच्चू कडूंना त्यांचा गड राखता येणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. पण, भाजपच्या अशोक बनसोड यांना कडवी झुंज देत अपक्ष बच्चू कडूंनी या मतदारसंघावर तिसऱ्यांदा आपला झेंडा रोवला. सोबतच कोणत्याही आमदाराला तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी न देण्याची या मतदारसंघाची परंपराही बच्चू कडू यांनी मोडीत काढली. (प्रतिनिधी)