दर्यापुरातील अनियंत्रित वाहतुकीचा बळी (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST2021-02-05T05:30:23+5:302021-02-05T05:30:23+5:30

दर्यापूर : शहरातील रस्त्याच्या अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेल्या अनियंत्रित वाहतुकीमुळे नवविवाहित महिलेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रोहिणी स्वप्निल ...

Victims of uncontrolled traffic in Daryapur (modified) | दर्यापुरातील अनियंत्रित वाहतुकीचा बळी (सुधारित)

दर्यापुरातील अनियंत्रित वाहतुकीचा बळी (सुधारित)

दर्यापूर : शहरातील रस्त्याच्या अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेल्या अनियंत्रित वाहतुकीमुळे नवविवाहित महिलेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रोहिणी स्वप्निल काकड (२७, रा. जोगर्डा) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. स्वप्नील गोवर्धन काकड असे किरकोळ जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

घटनेतील मृत विवाहिता ही तालुक्यातील उमरीबाजार येथील रहिवासी शेतकरी गोपाल डालके यांची मुलगी आहे. तिचे नोव्हेंबर २०२० मध्येच लग्न झाले होते. लग्नानंतर वैयक्तिक कागदपत्रात दुरुस्ती करण्यासाठी बुधवारी सकाळी एम. एच. २७- ४५९० क्रमांकाच्या दुचाकीने काकड नवदाम्पत्य दर्यापूर येथे आले होते. स्थानिक गांधी चौकातील पेट्रोलपंपासमोरून जाताना पुढून येणाऱ्या एम. एच. ३१ सी. व्ही. १९१२ क्रमांकाच्या ट्रकखाली चिरडल्याने रोहिणी या घटनास्थळीच दगावल्या. दुचाकीवरस्वार पतीला किरकोळ मार लागला असून, जबर मानसिक धक्का बसला आहे.

शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम वर्षभरापासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. दोन महिन्यांपासून पूर्णतः अर्धवट परिस्थितीत काम बंद पडले आहे. कामादरम्यान शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून ठेवलेले आहेत. या कामासाठी वापरलेले साहित्यसुद्धा विखुरलेल्या अवस्थेत पडलेले आहेत. यामुळे संपूर्ण शहरातील वाहतूक पूर्णतः अनियंत्रित झाली आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहेच. परंतु, बांधकाम विभागाचा हलगर्जीपणादेखील या घटनेवरून उघड झाल्याने दर्यापूर शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत असून, प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच दर्यापूरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने पंचनामा करून सदर ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालक मात्र पळून गेला.

बॉक्स

ट्रकवर दगडफेक, प्रसासनाप्रती रोष

नवविवाहितेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकवर दगडफेक केली. काचा फोडून प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला.

बॉक्स :

३० नोव्हेंबरला झाले होते लग्न

मूर्तिजापूर येथील सालासार मंगल कार्यालयात अत्यंत आंनदाच्या वातावरणात ३० नोव्हेंबर २०२० रोजी काकड दाम्पत्याचे लग्न पार पडले. या दुर्घटनेमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांच्या होत्या.

Web Title: Victims of uncontrolled traffic in Daryapur (modified)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.