साईनगरातील बसथांब्यामुळे वाहतुकीचा खोळंबा
By Admin | Updated: August 13, 2015 00:58 IST2015-08-13T00:58:22+5:302015-08-13T00:58:22+5:30
अमरावती मार्गावरील साईनगर चौफुलीवरील बसथांबा अन्य वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सर्व प्रकारची प्रवासी वाहने चौफुलीवरच थांबत असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होतो.

साईनगरातील बसथांब्यामुळे वाहतुकीचा खोळंबा
चौफुलीवर वाहनांची वर्दळ : अपघाताची शक्यता बळावली
बडनेरा : अमरावती मार्गावरील साईनगर चौफुलीवरील बसथांबा अन्य वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सर्व प्रकारची प्रवासी वाहने चौफुलीवरच थांबत असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा होतो. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ हा बसथांबा अन्यत्र स्थानांतरित करावा, अशी मागणी केली जात आहे.
अमरावती-बडनेरा मार्गावर साईनगर येथे थांबा आहे. अगदी चौफुलीवरच थांबा असल्यामुळे इतर वाहतुकदारांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. या थांब्यावर शहर बसेस, आॅटोरिक्षा, मिनीडोअर तसेच एसटी महामंडळाच्या बसेस थांबतात. रस्ता दुभाजकामुळे मागच्या वाहनाला समोर जाता येत नाही. परिणामी वाहतूक खोळंबून राहाते. अशी परिस्थिती या चौफुलीवर नेहमीच पाहता येते. या मार्गावर वाहनांची सतत मोठी वर्दळ असते. चौफुलीवरच प्रवासी वाहतूक थांबत असल्याने वाहने खोळंबलेली असतात. साईनगर परिसर मोठा आहे. या परिसरात रहिवााशांची संख्या अधिक आहे. साईनगरकडे याच चौफुलीवरून वाहनधारकांना जावे लागते.
त्याचप्रमाणे बडनेरा शहराकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या देखील प्रचंड आहे. याठिकाणी अगदी चौफुलीवर असलेला हा बसथांबा थोडा पुढे घेण्यात यावा, अशी मागणी साईनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. चौफुलीशिवाय अन्यत्र हा थांबा दिल्यास साईनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना अडचण होणार नाही. प्रशासनाने या गंंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीने बसथांबा हटविण्याची मागणी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी )