वरुणराजा, थांब रे आता !
By Admin | Updated: July 11, 2016 00:03 IST2016-07-11T00:03:04+5:302016-07-11T00:03:04+5:30
चातकाप्रमाणे प्रतीक्षा करायला लावल्यावर बरसू लागलेल्या जलधारा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणतात की काय,

वरुणराजा, थांब रे आता !
संततधार : नदी, नाले फुगले, जनजीवन विस्कळीत, सतर्कतेचा इशारा
अमरावती : चातकाप्रमाणे प्रतीक्षा करायला लावल्यावर बरसू लागलेल्या जलधारा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘बरस रे मेघराजा’, अशी आर्जव करणारा शेतकरी आता ‘वरुणराजा थांब रे आता !’, अशी विनवणी करू लागला आहे.
पाऊस उशिरा आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रांतात अद्याप पेरणी झालेली नाही. संततधार पावसामुळे पेरणी लांबू लागली आहे. ज्यांनी अलिकडेच पेरणी केली त्यांच्या शेतात अंकुरलेले इवले इवले रोप सततच्या पावसामुळे कुजू लागले आहे. ओल्या दुष्काळाकडे वाटचाल करणारी ही अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढविणारी ठरली आहे.
जिल्ह्यात गत चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. चंद्रभागा, पूर्णा, शहानूर नदी दुथळी भरुन वाहू लागली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. शनिवारी पूर्णा नदीवरील विश्रोळी धरणाचे ९ दरवाजे ४४६.२३ मीटरने उघडण्यात आले आहे. धारणी येथील भुतखोरा नाल्याला आलेल्या पुरामुळे धारणी- बऱ्हाणपूर रस्ता दोन तास बंद होता. तसेच वडनेरगंगई जवळ झाड पडल्याने अकोट - दर्यापूर राज्य महामार्ग तीन तास बंद होता. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे दर्यापूर तालुक्यातील १८ गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
धामणगांव, चांदूररेल्वे व चिखलदरा तालुक्यात शनिवारी अतिवृष्टी झाली. पाच हजार एकरांतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जनजीवन विस्कळीत
अमरावती: गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदीनाल्यांना आलेल्या पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वडनेर गंगाई येथे झाड पडल्याने दर्यापूर अकोटमार्ग तर धारणी येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे धारणी बऱ्हाणपूर मार्ग बंद झाला होता. पेढी, पूर्णा, बिच्छन, मेघा चंद्रभागा व शहानूर नदी आदी नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विश्रोळी धरणाचे शनिवारी ९ दरवाजे उघडण्यात आले. हे विशेष तिवसा तालुक्यातही पिंगळा व सूर्यगंगा नदीचे पाणी शेतात शिरल्यामुळे नुकसान झाले आहे. अमरावती तालुक्यातील रोहनखेडा गावाला पूराचा विडख्यात आहे. तर या गावाचा जनसंपर्क तुटला असून शिरजगाव कस्ब्यातही पाणी शिरले आहे.
वर्धा नदीचा पूर ओसरला
वरुड तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला शुक्रवारी पूर आला. त्यामुळे शनिवारी रात्रीही वरुड ते पांढुर्णा हा मार्ग काही तासांपुरता बंद होता. या तालुक्यात रविवारी १० जूलै पर्यंत २६६ मि. मी.. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या तालुक्यातून वाहणाऱ्या शक्ती, जीवना, चुडामणी, टोकी, धवलगिरी ,पाक नद्या वाहत आहेत. मात्र या नद्यांना अद्यापपर्यत पूर आला नाही.
चांदूररेल्वे : तालुकयात अतिवृष्टी झाली होती. परंतु रविवारी काही ठिकाणी तूरळक पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या तालुक्यात शेतकऱ्यांना अजुनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
चिखलदऱ्यात रिमझिम : चिखलदऱ्यात रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस होता. या तालुक्यात शनिवारी अतिवृष्टी झाली होती. परंतू रविवारी पावसाचा जोर कमी दिसून आला. आतापर्यंत ४५५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
परतवाड्यात बिच्छन नदीला पूर; वाहतूक विस्कळीत
परतवाडा शहरातून वाहणाऱ्या बिच्छन नदीला रविवारी पूर आल्यामुळे कल्याण मंडपम्पासूनचा अंतर्गत रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होती.
शिरजगाव कसबा गावात पाणी शिरले
चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा गावात मेघा नदीला पूर आल्यामुळे पाणी शिरले. पुरामुळे किती नुकसान झाले, हे कळू शकले नाही. पुरामुळे पुलावरुन पाणी वाहत असल्याने शिरजगाव ते बहिरम मार्ग पूर्णत: बंद झाला होता.
टाकरखेडा संभू येथे नाल्याला पूर
भातकुली : तालुक्यातील टाकरखेडा संभू येथील रेणुका नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. हा पूर पाहण्यासाठी गावऱ्यांनी गर्दी केली होती. मध्यप्रदेशमध्ये धो-धो पाऊस कोसळत असल्याने पेढी नदीच्या पुराची पातळी वाढत असल्याने सावगा, देवळा, फाजलपूर येथील संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण झाली असून जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तिवसा तालुक्यात घर कोसळले
तिवसा : तालुक्यातही दिवसभर रिमझीम पाऊस पडला शनिवारी येथे दमदार पाऊस झाला होता. रविवारी एका व्यक्तीचे घर पडल्याचे प्रशासनाने सांगितले.
अंजनगाव तालुका
अंजनगाव तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत सरासरी २५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारपर्यंत १७ मि. मी. पाऊस झाला आहे.गतवर्षी २५१ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. शहानूर धरणाचा जलसाठा पाहिजे तसा वाढला नसल्याने शहानूर धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही, अशी माहिती निवाशी तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली.
दर्यापूर तालुका
दर्यापूर तालुक्यात सरासरी २२७ मि. मी. पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. गतवर्र्षी १० जूलै पर्यंत १७९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. दोन दिवसांत ९.८५ मि.मी. पाऊस पडला आहे. शनिवारी पूर्णा धरणाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे १८ नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. बेंबळा नदीला पूर आला आहे. मात्र शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणी आटोपली असून दमदार पाऊस येण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
पथ्रोट (अचलपूर) येथे थापेरा नाल्याला पूर
मध्यवस्तीतून वाहणारा थापेरा नाल्याला दुपारी २ वाजता दरम्यान पूर आल्याने प्रशासनाने नाल्याकाठच्या २०० जणांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. रात्रीपासूनच धो- धो पाऊस कोसळला आहे. थापेरा नाल्याचा शहानूर धरणाजवळ खोंगळा या गावात उगम आहे. या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे नाल्याला पूर आला असून पूरामुळे काही पाणटपऱ्या पाण्याखाली होत्या. यंदा पावसाळयात पहिलाच पूर असल्यामुळे नागरिकांनी ते बघण्यासाठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे.
धारणीत भुतखोरा नाल्याला पूर
धारणी तालुकयातील भुतखोरा नाल्याला पूर आल्यामुळे दुपारी रविवारी २ त े४ वाजेपर्यंत अमरावती- बऱ्हाणपूर मार्ग दोन तास बंद होता. बराच काळ वाहतूक ठप्प होती. तालुक्यातील सिपना, गडगा, तापी, खंडू, खापरा आदी नद्या ओसंडून वाहत आहेत. आतापर्यंत २९२ मि. मी. पावसाची सरासरी नोंद करण्यात आली. गतवर्षी केवळ १४६ मि.मी. पाऊस कोसळला होता.
बगाजी सागरचे तीन दरवाजे उघडले
धामणगाव तालुक्यात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. तालुक्यात शनिवारी अतिवृष्टी झाली होती. वर्धा नदीवरील बगाजी सागर धरणाचे रविवारी तीन दरवाजे ७ से. मी. ने उघडण्यात आले आहे. वर्धा नदीचा पूर ओसरला काहीसा आहे.
आज जिल्ह्यातील एखाद्या ठिकाणी मुसळधार; हवामान तज्ज्ञांचा अंदाज
सोमवारी जिल्ह्यातील एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार असून गुरुवारनंतर पाऊस ओसरणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिला आहे. झारखंड व ओरिसा कमी दाबाचा पट्टा असून चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चीम मध्यप्रदेशावरही चक्राकार वारे आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर व राजस्थान ते पश्चिम बंगाल मार्गे छत्तीसगडवर कमी दाबाची द्रोणिय स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे सोमवारी बऱ्याच ठिकाणी पाऊस बरसणार असून एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवार व बुधवार जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडणार असून तो गुरुवारनंतर थोड्याफार प्रमाणात पाऊस ओसरणार असून १५ ते १७ जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर...
२६ जूनपर्यंत पेरणी करू नका, असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. काही शेतकरी थांबले. अमरावती जिल्ह्यात त्यानंतरही काही भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. आला तो संततधार. पेरणीसाठी आवश्यक उघाडच मिळाली नाही. आता अनेक शेतकऱ्यांची पेरणी अडचणीत आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता गरजेची
पाऊस थांबून थांबून येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्पष्ट केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या मते, शेतकरी धोक्यात नाहीत; तथापि जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पीक नुकसानीची स्थिती आहे. केवळ तलाठी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या आकड्यांच्या खेळांवर अवलंबून न राहता जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने जिल्ह्यातील पीक स्थितीचा संवेदनशीलपणे कानोसा घ्यावा. जिल्ह्यातील बळीराजा अडचणीत आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बळीराजाला बळ द्यावे.